मोहाडी :- भंडारा जिल्हा अनलॉक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आल्याने दुकानांना वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र ग्रामीण भागाकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नसल्याने तेथील बाजार व दुकाने मास्क व सोशल डिस्टनसिंगचे नियम न पाळता सायंकाळपर्यंत सुरू असतात. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रूग्ण ग्रामीण भागत आढळल्यानंतरही नागरिक बेफिकिर दिसत आहेत.
कोरोनाने शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुध्दा कहर केला. अनेक लोकांचे बळी गेले. अनेक परिवाराला घरची कमावती व्यक्ती किंवा प्रियजन गमवावा लागला. हे दुःख आजही त्यांना सलत आहे. परंतु आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा बेफिकिर झाले आहेत. गत वर्षी सुद्धा असेच झाले व कोरोनाची महाभयंकर लाट आली. रुग्ण जास्त व बेड, ऑक्सिनज सिलिंडर कमी अशी परिस्थिती उदभवली. बेड न मिळाल्याने अनेकांनी घरीच प्राण सोडले. तर काहींनी लाखो रुपयांचा उपचार केला. जनतेच्या डोळ्यासमोर हे वास्तव असतांनाही पुन्हा आता लोक सैरभैर होत आहेत.
मास्क, सेनेटायझर, सोशल डिस्टनसिंग चा वापर करणे विसरले आहेत. शहरी भागात आठवडी बाजार बंद असला तरी ग्रामीण भागातील काही गावात आठवडी बाजाराला सुरवात झाली. तेथे गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील काही मोठ्या गावातील सर्व प्रकारची दुकाने नियम धाब्यावर बसवून सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कोरोनाने विस्कळीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असताना जनतेची छोटीशी चूकही मोठी हाऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियम जनतेने काटेकोरपणे पाळणे हाच एकमेव उपाय आहे. तालुका प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.