अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बीएसएनएल विरोधात ग्राहकांमध्ये आक्रोश भंडारा : भारत संचार निगम देशभरात दूरध्वनी व भ्रमणध्वनीचे जाळे विणण्याचा प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा फायदा व्हावा, यासाठी धडपड करीत आहे. मात्र भंडारा तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या निगमच्या वतीने कव्हरेज देण्याच्या सेवेत त्रृटी निर्माण होत असल्याने भ्रमणध्वनीसेवा निकामी ठरत आहे. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष व्यक्त केल्या जात आहे. कव्हरेज वाढविण्यात यावे, अशी मागणी खुटसावरी, टेकेपार, पिंपळगाव, माडगी परिसरातील नागरिकांनी केली आहे.भारत संचार निगम लिमिटेड शाखा एमआयडीसी राजेगाव येथे कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. कार्यालय परिसरातील गावांना दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवेचा लाभ मिळावा, असा उद्देश निगमचा आहे. मात्र लाखो रूपये खर्चून खुटसावरी या गावासाठी १० वर्षापुर्वी केबल घालण्यात आले होते. एक-दोन वर्ष दुरध्वनीसेवा सुरळीत होती. मात्र त्यानंतर अनेकदा तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. लाखो रूपये खर्चून या गावातील ग्राहकांसाठी बीएसएनएलने दूरध्वनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गावात सद्यस्थितीत एकही दुरध्वनीधारक नाही. भारत देशात खुटसावरी हे 'दूरध्वनीमुक्त गाव' अशी ख्याती परिसरात आहे. दूरध्वनीसेवा अयशस्वी झाल्यानंतर नागरिकांचा कल भ्रमणध्वनी सेवेकडे गेला. खुटसावरी गावातील अनेकांनी भ्रमणध्वनी खरेदी करून बीएसएनएलचे सीम वापरले. मात्र कव्हरेजअभावी भ्रमणध्वनीसेवा ठप्प झाली. परिणामी अनेक ग्राहकांनी खाजगी कंपन्यांचे सीम वापरणे सुरू केले आहे. अनेकांजवळ आजही बीएसएनएलचे सीम असून सेवाप्राप्तीसाठी स्लॅब, झाड, टेकडीचा आसरा घेवून सेवेचा आनंद घेत आहेत. कव्हरेज का मिळत नाही, याचा शोध घेण्याचा थोडासा प्रयत्नही अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या खुटसावरी गावात कव्हरेज का मिळत नाही, याचा शोध घेण्याची अधिकाऱ्यांना गरज आहे. खुटसावरी परिसरात माडगी, टेकेपार, पिंपळगाव या गावात निगमची सेवा पुर्णत: ठप्प असते. अनेकदा त्यांना लाखनी गाठून संदेशवहन करावे लागते. एकीकडे केंद्रशासन बीएसएनएलची सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपाययोजना करून ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असला तरी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत ही सेवा मिळते काय, याकडे केंद्रासह राज्य शासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)कार्यालय कुलूप बंदएमआयडीसी परिसरात असलेले संचार निगम कार्यालय नेहमीच बंद असते. त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न आहे.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी ठरताहेत शोभेची वास्तू
By admin | Updated: April 25, 2015 00:52 IST