लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ भंडारा येथे बुधवारी दुपारी १ वाजता विशाल रॅली काढण्यात आली. शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर देवस्थान येथून ही रॅली निघाली. ५०० मीटर लांब तिरंगा हातात धरुन महिला व पुरुषांनी विधेयकाच्या समर्थनार्थ घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.दुपारी १ वाजता काढण्यात आलेली ही रॅली जलाराम चौक मार्गे गांधी चौक, मोठा बाजार परिसर व शेवटी या रॅलीचा समारोप त्रिमूर्ती चौकात करण्यात आला. सर्वात शेवटी रॅलीचे रुपांतर सभेत करण्यात आले. जनकल्याण मंचच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला असला तरी यात सर्वसमाजातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे या रॅलीत महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ही रॅली कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर या विधेयकाच्या बाबतीत चुकीची माहिती देऊन समाजात संदेश देत असल्याबाबत काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.नागरिकत्व सुधारणा कायदा हा अफगाणीस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून होणाऱ्या धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन धर्मीयांसाठी आहे. परंतु या कायद्याबाबत अपप्रचार केला जात आहे. देशभरात या कायद्याच्या निषेधार्थ जाळपोळीच्या घटनाही सुरु आहेत. मात्र भंडारा येथे या विधेयकाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. दंगेखोरांवर कारवाई करावी असाही सूर या रॅलीच्या माध्यमातून उमटला. त्रिमूर्ती चौकात उपस्थित वरिष्ठ नेत्यांनीही मार्गदर्शन केले.त्रिमूर्ती चौकात झाली सभाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या त्रिमूर्ती चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर उपस्थित नेत्यांनी नागरिकांना संबोधित केले. रॅलीमध्ये खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार बाळा काशीवार, म्हाडाचे अध्यक्ष मो.तारिक कुरैशी, कलाम शेख, जॅकी रावलानी, ईश्वरीलाल काबरा यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रॅलीचे संयोजक आशिष पालीवाल, जिल्हा संघचालक राम चाचेरे, विश्व हिंदू परिषदेचे संजय एकापुरे, शीतल तिवारी, रोशन काटेखाये, विजू दास, भरत मल्होत्रा, राजकुमार भोजवानी, प्रीती गोसेवाडे, लिना गहाणे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.भारत मातेचे पूजन करून रॅलीचा प्रारंभबहिरंगेश्वर देवस्थानातून रॅलीला प्रारंभ करण्यापूर्वी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ आवाज बुलंद केला. यानंतर या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील अरुंद गल्लीतून निघालेली रॅली मुख्य मार्गाहून शेवटी त्रिमूर्ती चौकात पोहचली. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीला पाहण्यासाठी भंडारेकरांनी गर्दी केली होती. यावेळी सभेत कायदा व सुव्यवस्था चोख बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.