मोहाडी : संजय गांधी निराधार योजना समितीच्या फक्त अध्यक्षाचीच नियुक्ती झाली असल्यास विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे अर्ज अध्यक्ष व शासकीय सदस्यांनी निकाली काढावे, या बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १७ आॅगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे.राज्यातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, देवदासी, परित्यक्ता, दुर्बल घटकांना विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनांमधून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांमधील लाभार्थ्यांचे अर्ज तालुकास्तरावरील संजय गांधी योजना समिती मार्फत मंजूर करण्यात येतात. शासनाने २७ जुलै २०१५ रोजी आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये क्षेत्रीय पातळीवर अधिकाऱ्यांशी बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. ज्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षाची नेमणूक झाली आहे तथापि कोणत्याही सदस्याची नेमणूक झाली नाही, अशा वेळी बैठक घेण्याचे शासनाचे निर्देश नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून निराधारांचे प्रकरण प्रलंबित पडले आहे. निराधार लाभार्थी लाभाच्या अपेक्षेत प्रतीक्षा करीत आहेत.आता शासनाने ज्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या फक्त अध्यक्षांची झालेली आहे, परंतु अन्य एकाही अशासकीय सदस्यांची नियक्ती झाली नाही. अशाप्रसंगी अध्यक्ष व शासकीय समिती अस्तित्वात येईल. या समितीने नियमानुसार बैठका आयोजित करून लाभार्थ्यांच्या अर्जावर निर्णय घ्यावा, अशा सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
निराधार योजनेच्या शासकीय सदस्यांना विशेषाधिकार
By admin | Updated: August 19, 2015 01:03 IST