लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :तुमसर शहर व तालुक्यातील १५० गावांत मागील महिन्याभरापासून सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयुष्य संपलेल्या तारातून वीजपुरवठा केला जात आहे. त्याच्या फटका येथे सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत आहे. पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तरीसुद्धा दिवसातून किमान चार ते पाच वेळा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अधूनमधून उन्ह तापत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
तुमसर शहराची लोकसंख्या सुमारे ७० हजारांच्या घरात असून तालुक्यात १५० गावांचा समावेश आहे. मागील महिन्यापासून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडित होण्याचे सत्र सुरू आहे. वादळ व पाऊस आल्याचे कारण वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सांगत आहेत.
त्यानंतरही वादळ व पाऊस पडला नाही तरी मागील पंधरा दिवसांपासून कायम वीज खंडित केली जात आहे. शहरातील व गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा सातत्याने कमी जास्त होत आहे.
वीजतारांचे आयुष्य संपले?वीज वाहून नेणाऱ्या तारा या खूप जुन्या असल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो, असे सांगण्यात येते. खांबावरील इन्सुलिटर्स हे जुने झाले आहेत. उच्च दाबामुळे ते इन्सुलिटर्स फुटतात काही. इन्सुलिटर्स क्रॅक होतात. त्यामुळेही वीज पुरवठा खंडित होत असतो. विजेचा दाब वाढल्यानंतर वीजपुरवठा ऑटोमॅटिक बंद होतो. वादळवारा आला असेल तर खबरदारी म्हणून वीज पुरवठा बंद केला जातो. वीज वितरण कंपनीने येथे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
देव्हाडी फीडरवरून गावांना वीजपुरवठादेव्हाडी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे रेल्वे स्थानक आहे. मोहाडी फीडरवरील असलेल्या गावांना परसवाडा, पांजरा, मांढळ, स्टेशन टोली या गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे विजेचा लोड वाढत असल्याने देव्हाडी व परिसरातवीजपुरवठा खंडित होत आहे. मोहाडी येथून यापूर्वी या गावांना वीज पुरवठा केला जात होता. वीजपुरवठा करणाऱ्या वीजतारा या कमकुवत असल्याने त्यांना देव्हाडी फीडर येथे जोडण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने उष्णतेपासून लहान मुले व वृद्धांना त्रास होत आहे.