शेतकऱ्यांच्या यातना संपेना : शेतातील धान करपले, जमिनीला पडल्या भेगा, बळीराजाच्या घरी सावकाराच्या येरझाराभंडारा : मागील चार वर्षांपासून निसर्गाची अवकृपा असतानाही जिल्ह्यातील शेतकरी यावर्षीतरी पदरात काही दान पडतील या आशेने शेती कसत आहे. परंतु निसर्गाने शेतकऱ्यांचा पिच्छा मात्र सोडलेला नाही. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तरी धान्य पिकू दे गा, अशी याचना शेतकरी करीत आहे.करडी (पालोरा) : शेतकऱ्याने शेतात राबून घामाच्या धारा वाहिल्या, रक्त आटवले, पैसा खर्च केला. रोवणी आटोपली अन् पावसाने दगा दिला. शेतात पाण्याअभावी धानाचे जीवंत पिक करपू लागले आहेत. जमिनीत फक्त भेगा दृष्टीस पडताहेत. शेतांकडे पाहायची हिंमत त्या शेतकऱ्यांची नाही. ही विदारक परिस्थिती आहे, करडी परिसरातील शेतीची व त्या शेतीत राबविणाऱ्या शेतकऱ्यांची.करडी परिसरात कोरड्या दुष्काळाचे चिन्ह आतापासून दिसू लागले आहेत. परिसरात २७ आॅगस्ट पर्यंत फक्त ५०७ मिमी पावसाचे नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण ५४ टक्के आहे. मागील वर्षाची तुलना केल्यास तफावत नजरेस पडणारी आहे. तरीही मागील वर्षी परिसरातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. शेतीसाठी लागणारा अर्धा खर्चही उत्पन्नातून भागू शकला नाही. अपुऱ्या पावसाने शेतीचे कंबरडे मोडले. त्यातच कीड व रोगांनी होत्याचे नव्हते केले. कीड व रोगांनी शेतीची धुळधाण केली. जनावरांनासुद्धा चारा उपलब्ध होऊ शकला नाही. तणसीला वास होता. शासनाने दुष्काळी मदतीचे आश्वासन दिले. परंतु वर्ष लोटत असतानाही एक दमडीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.यावर्षी पुन्हा नव्या दमाने शेतकऱ्यांनी सावकार, बँका, सोसायट्या व मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेऊन शेती कसली, पाऊस कमी झालेला असताना समोर अच्छे दिन येण्याच्या आशेपायी डिझेल व कृषी पंपाने पाणी ओढून रोवणी कशीबशी पूर्ण केली. बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याअभावी रोवणी केलेली नाही. रोवणी आटोपली आणि ६ आॅगष्ट पासून पावसाने दडी मारली. ती आजही कायम आहे. पाण्याअभावी धानाच्या शेतीत फक्त भेगा पडलेल्या दिसत आहेत. रोवणी झालेले धानाचे पीक बऱ्याच शेतात उभे झालेले नाही. जमिनीच्या भेगा जशा वाढत जात आहेत तसे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर व खर्चावर शेतकरी अश्रू ढाळत आहेत. डोंगरदेव परिसरात शेतीकडे जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. अपुऱ्या पावसाने धानपिकांची अवस्था गंभीर मासळ : यापूर्वीच्या अपुऱ्या पावसाने व खंडीत पाऊस झाल्याने धानाच्या लागवडीच्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण न झाल्याने सध्या धान पिकाची अवस्था बिकट होवून गंभीर झालेली आहे.सुरुवातीला पावसाच्या तब्बल ९ महिना विलंबनाने परिसरातील शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. बऱ्याच शेतकऱ्यांनी नेहमीचा पावासाचा लहरीपणा लक्षात घेवून आवते (बाशी) टाकले. परंतु रोवणी योग्य पाऊस न पडल्याने धानरोवणीचा हंगाम यावर्षी बराच दीर्घकाळ टिकून राहिला. कसाबसा पाण्याचा वापर करून व सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु आवत्या धानाला नांगरणी करून मशागतीला जो पाणी आवश्यक असतो तो पाणी न झाल्याने शेतकऱ्यांनी धानाला नांगरणी केलीच नाही. मुदत संपूनही पावसाचा थांगपत्ता नसल्याने वर थेंबी धान उत्पादक संकटात सापडले. त्यांच्या धानाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने, अर्धेअधिक उत्पादन आताच कमी होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत धान जोमदार यायला हवे होते. परंतु पाण्याअभावी जमीन टणक बनली आहे. त्यामुळे धानाची रोपटे पाहिजे तसे वाढलेले नाहीत. एकुण लागवडीच्या क्षेत्रापैकी ८० टक्के शेतजमिनीत रोवणी पूर्ण झाली. परंतु अजूनही २० टक्के शेती पावसाअभावी रोवणी न झालेल्या स्थितीमध्ये नेहमीचा अनुभव पाहता, बऱ्याच शेतकऱ्यांनी दमदार पावसाची शक्यता संपलेली आहे. एकुण कालावधीच्या २५ टक्के कालावधी लोटला व ७५ टक्के कालावधी पिक निघण्यासाठी उरलेला आहे. मात्र सुरुवातीपासून पावसाची व पाण्याची चणचण भेडसावत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम पडेल, असे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी दमदार पाऊस न झाल्याने पाणीसाठ्याच्या पातळीत तसेच भूगर्भातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाट न झाल्याने, सिंचनाच्या सोयी असलेले शेतकरी सुद्धा सध्या चिंतेत आहेत. पोळ्यापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर दुष्काळाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. सासरा परिसरात धानपिक धोक्यातसासरा : सासरा व परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरिपातील धानपिक धोक्यात आले आहे. जुलै व आॅगस्ट हे खरे पावसाचे महिने असूनसुद्धा यावर्षी या दोन्ही महिन्यात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. दरवर्षीचा अनुभव पाहता या दोन्ही महिन्यात पडलेल्या पावसाने भूजल पातळी उंचावत असते. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी, तलाव, बोड्या इत्यादी जलस्त्रोत सक्षम बनत असतात. पण यावर्षी संपूर्ण चित्र उलटे दिसत आहे. अद्यापही विहिरींची भूजल पातळी उंचावली नाही. तसेच सिंचन सुविधा म्हणून ओळख झालेले तलाव, बोड्या रिकामेच आहेत.सध्याचा काळ पावसाचा काळ म्हणून ओळखला जातो. याच कालावधीत नदी, नाल्यांना पूर, महापूर, येत असते. तलाव, बोड्या इत्यादी जलस्त्रोत तुडूंब भरलेले असतात. पावसाच्या नियमितपणाने शेतकरी प्रफुल्लीत असतो. पण यावर्षी विपरित परिस्थितीने शेतऱ्यांच्या वाट्याला फारच दु:खद अनुभव आलेला आहे. पेरण्या झाल्या. कसेबसे रोवणे आटोपले. पावसाच्या दडीने धानपिकाची वाताहत होत आहे. इतकेच नाही तर बऱ्याच क्षेत्रात लष्करी अळी, खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, करपा, इत्यादी रोगांना धानपिक बळी पडलेले आहे. शेतकऱ्यांनी विविध रोगांच्या निर्मूलनासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करून पिक हाती येईल. या आशेने पुन्हा पदरमोड करून, कर्ज घेऊन धानशेती वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहे. सध्याचे वास्तव चित्र पाहून शेतकरी वर्ग मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.पाऊस आज पडेल, उद्या पडेल, आपली प्रतिक्षा संपेल, सर्व बिकट परिस्थिती आटोक्यात येईल, पिक हाती येईल. या आशेवर शेतकरीवर्ग आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण प्रत्येक दिवस विरोधाभास दर्शवत असल्याने अधिकाधिक चिंतातूर होत असल्याचे दिसत आहे.सासरा व परिसरात सिंचन सोय पुरविणारा महत्वाचा जलस्त्रोत शिवणीबांध जलाशय अद्यापही तहानलेलाच आहे. अकरा फुट पाण्याच्या पातळीची क्षमता असलेल्या या जलाशयात आतापर्यंत केवळ एक ते दीड फूट पाण्याची पातळी वाढलेली आहे. सध्या या जलाशयात सव्वा पाच फुट पाणी संचयीत आहे. सध्याची पातळी राखीव पाण्याचीच असल्याने या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग नसल्याचे वास्तव चित्र शेतकऱ्यांना हवालदिल करत आहे.विद्युत पंपाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी केवळ ८ तास थ्री फेज विद्युत मिळत होती. हा कालावधी फारच कमी असल्याने भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर येथील शेतकऱ्यांना महावितरतणच्या व शासनाच्या विरोधात जनआंदोलन केले. परिणामी सध्या ८ तासावरून १२ तास थ्री फेज विद्युत पुरवठा मिळत आहे. याही कालावधीने शेतकरीवर्ग समाधानी असल्याचे दिसत नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या विळख्यात शेतकरी अडकला आहे.भावी काळ फारच वाईट आणि समस्यांनी ग्रासला असल्याचे स्वप्न पाहत असून अंतर्मनातून पुरता खचल्याचे दिसत आहे. पावसाअभावी सध्यातरी येथील शेतकरीवर्ग शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या नाडल्या गेला आहे. परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, विवाहादी कार्यक्रमांचा खर्च कर्जाच्या रकमेचे देणे इत्यादी प्रश्नांनी अधिकाधिक हतबल झाल्याचे दिसत आहे. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन दिलासा दाखल, सोई सुविधा पुरविण्याची नितांत गरज आहे. विद्युत विभागाचा अन्यायकरडी परिसरात भारनियमण होत असून सुमारे ८ ते १० तास विजेचा पुरवठा केला जातो. त्यातही वारंवार वीज पुरवठा खंडीत केल्या जाते. दुरुस्तीच्या नावाखाली बऱ्याचदा दिवसभर वीज बंद ठेवली जाते. १४ ते १६ तासाचे भारनियमन विद्युत विभागाने सुरू केले आहे. विद्युत विभागावर आक्रमण करण्यास तयार असतात, त्या भागात १२ तासाची लोडशेडिंग सुरू आहे. करडी परिसराला १६ तासांच्या भारनियमनाचा शॉक दिला जात आहे.तलाव, बोड्यांत पाण्याचा अल्पसाठातलावांचा परिसर म्हणून करडी परिसराची ओळख असून परिसरात आंबेतलाव, नवतलाव, खांडीचा तलाव, सागर बांध, हुटकाळा, पाझर, किसनपूर, लेंडेझरा आदी मोठे तलाव असून लहान तलावांची मोठी संख्या आहे. परंतु सर्व तलावात पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. खरिपातील पिकांना पाणी मिळेल, याची शाश्वती नाही. नाल्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांचे व नाल्यांचे खोलीकरणाबरोबर अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे.धानावर लष्करी अळी व कीडीचा प्रादुर्भावधान पिकांवर पाण्याअभावी करपणे सुरु असतानाच कीड व रोगांची उच्छाद मांडला आहे. परिसरातील लष्करी अळीने थैमान घातले आहे. खडकी परिसरात अळीने अनेक शेतातील पिक कापल्यासारखी खरडून निघाली आहेत. कृषी विभागाने शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अनुदानावर औषधांचे वितरण करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. लष्करी अळीचे आक्रमण रोखण्यासाठी औषधांच्या वितरण बरोबर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेची मागणीसन २०१५-१६ वर्षात परिसरातील एकही गावांचा समावेश या योजनेत झालेला नाही. मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीपलीकडील १० गावांचा समावेश करण्यात आला. सन २०१६-१७ च्या नियोजनात करडी परिसरातील सर्व गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्याची मागणी होत आहे.
रोवणी आटोपली अन् पावसाने दिला दगा
By admin | Updated: August 28, 2016 00:26 IST