जनहित याचिका दाखल करणार : पुरातत्त्व विभाग, पालिका प्रशासनामुळे त्रस्तअशोक पारधी पवनीविदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले पवनी नगर प्राचीन जवाहर गेट, परकोट, मोठ्या संख्येने असलेले मंदिर, उत्खननात सापडलेले भव्य स्तुपाचे अवशेष यामुळे पर्यटनस्थळ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. परंतु पुरातन स्थळ पवनीच्या विकासात अडथळा ठरत असून पुरातत्व विभाग व पालिका प्रशासनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित घोषित केलेल्या स्थळामध्ये प्रामुख्याने जवाहरगेटचा समावेश आहे. गेट संरक्षित स्थळ असल्याने गेटपासून ३०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास विभागाच्या एका आदेशान्वये मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नगरात बांधकामाची गती मंदावली आहे. जवाहर गेटच्या परिसरात कित्येक जुनी घरे आहेत. नागरिकांना त्या घरात राहणे अवघड झालेले आहे. जुनी घरे पाडून नवीन घरे लोकांना बांधायची आहेत. घराचे बांधकाम करण्यासाठी नागरिक नगरपालिका प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल करतात. परंतु पुरातत्व विभागाचे पत्रकान्वये संरक्षित स्थळापासून १०० मिटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास मंजूरी दिल्या जात नाही. २०० ते ३०० मिटर परिसरात बांधकाम करावयाचे असल्यास भारतीय पुरातत्व विभागाकडून मंजूरी घेणे अत्यावश्यक केलेले आहे. गेल्या चार पाच वर्षात कित्येक प्रस्ताव भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आले.परंतु परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी नाही त्यामुळे कोणीही बांधकाम करू शकत नाही. त्यामुळे नागरिकांचे घर बांधकाम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. त्यांची गरज पूर्ण होत नाही व पालिकेला मालमत्ता करात भर घालता येत नाही.पुरातत्व विभागाचे आदेशामुळे परवानगीशिवाय बांधकाम करता येत नाही. परंतु गरज म्हणून बांधकाम केल्यास विभागाकडून पोलिसात तक्रार दिल्या जाते व कारवाई सुद्धा केल्या जाते.स्वत:चे वडिलोपार्जीत जागेवर घर बांधण्यास अडथळे येत असल्याने नागरिक पालिका प्रशासन व पुरातत्व विभाग यांचेवर संतापलेले आहेत. स्वत:चे हक्कासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी नागरिक न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची चर्चा सुरु आहे.
पवनीकरांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण
By admin | Updated: April 27, 2015 00:12 IST