लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी / नाकाडोंगरी : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, भंडारा जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांनी येत्या २६ जूनला वैनगंगा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात चालकांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तांना जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे.
हे चालक गेल्या १७ ते १८ वर्षापासन २४ तास आरोग्य संस्थेत अल्प मानधनावर सेवा देत आहेत. अनेकदा निवेदने देऊनही त्यांच्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप चालकांनी केला आहे. मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन एकत्रितपणे त्वरित अदा करण्यात यावे, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळावे, १० वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या आणि बाह्यस्रोत संस्थेकडून कंत्राट मिळाल्यामुळे कार्यरत असलेल्या वाहनचालकांचे इतर एनआरएचएम कर्मचाऱ्यांप्रमाणे समायोजन करण्यात यावे, समान काम समान वेतन त्वरित लागू करून फरकाची रक्कम देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.