नाना पटोले यांचे प्रतिपादन : गर्रा येथे आढावा बैठक भंडारा : सांसद आदर्श ग्राममध्ये नाविण्यपूर्ण योजना राबवून लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने काम करावे. आदर्श ग्राममधील प्रत्येक नागरिक आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. सांसद आदर्श दत्तक ग्राम गर्रा-बघेडा येथे नियोजित कामांसाठी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, सरपंच तरटे, सभापती शुभांगी रहांगडाले, पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख उपस्थित होते. यावेळी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कुल व ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या गावातील ४३९ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. त्यापैकी ३५९ कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी निधी देण्यात आला असून ३३ शौचालये पूर्ण झाले आहेत. मार्च २०१६ पर्यंत प्रत्येकाच्या घरी शौचालये असेल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी सांगितले. गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खत प्लॉन्ट तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी विभाग आणि आत्मा यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्रित बसून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजन करावे, शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड, फळलागवड आणि आधुनिक शेती करण्यासाठी प्रात्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी दिले. गावात आतापर्यंत ३.८० हेक्टर क्षेत्रावर रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली. तसचे सिमेंट नाला बांध, ९ शेततळे तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी दिली. त्याचबरोबर गावात दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी अझोला लागवडीचे ९० प्रात्यक्षिके करण्यात आली. गावात दुग्ध उत्पादन ११०० लिटर होते. ते आणखी वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या दुधाळ जनावरांचा पुरवठा करावा. चांगल्या प्रतीच्या शेळया आणि कोंबडयांची पिल्ले द्यावीत. दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षणही गावकऱ्यांना द्यावे. प्रत्येक कामात व्यावसायिकता, गुणवत्ता दिसली पाहिजे, असे खा. पटोले म्हणाले. गावातील दोन मामा तलावांचे दुरुस्ती जलयुक्त शिवार अभियानात करण्यात येणार आहे. उर्वरित एका मामा तलावाचे खोलीकरणासाठी दुसऱ्या फंडातुन निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन दिले. गर्रा-बघेडामधील ७२७ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना आरोग्य पत्रिका देण्यात आली आहे. गावातील १४ कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले असून त्यांना कुपोषणाच्या श्रेणीतुन बाहेर काढले आहे. आम आदमी विमा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती नागरिकांना उपलब्ध द्यावी. वनविभागाने गावातील 192 कुटुंबांना एल.पी.जी. चे वितरण केले असून गावकऱ्यांना मध उत्पादनासाठी प्रशिक्षण दिले आहे. बचतगटांना अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. (शहर प्रतिनिधी)
‘आदर्श ग्राम’साठी लोकसहभागाची गरज
By admin | Updated: November 25, 2015 03:13 IST