भंडारा : जिल्ह्यात गार वारे वाहत असल्यामुळे जिल्हावासीयांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. ७ डिसेबर रोजी पारा १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. आज, गुरुवारी किमान तापमान १३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. थंडीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच थंड वारे वाहत आहेत. या हवामानामुळे पहाटे दरम्यान कडाक्याची थंडी पडत असून दवबिंदू जमा होत आहेत. ग्रामीण भागासह आता शहरातही सायंकाळी शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे. रात्रीला शहरात थंडीमुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. रस्ते निमर्नुष्य असतात. रात्री, पहाटेदरम्यान वाहनांची संख्या मार्गावर रोडावलेली दिसून येते. या थंडीमुळे नागरीकांची दिनचर्या सकाळी उशिरा सुरू होत आहे. शहरात ऊनी कापड घेण्यासाठी दुकानांमध्ये नागरीकांची झुंबळ होत आहे. थंडीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे. आज दिवसभर नागरिकांनी थंडीच्या बचवासाठी घोंगडे, स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी उनी कापडांचा वापर केल्याचे दिसून आले़ कारधा स्थित हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज सकाळी कमाल तापमान २६ तर किमान तापमान १३ आणि सायंकाळी कमाल तापमान ३१ तर किमान तापमान १६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. येत्या काही दिवसात पाऱ्यामध्ये कमालिची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (नगर प्रतिनिधी)थंडीच्या दिवसांमध्ये शरीराच्या तापमानात घट होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अस्थमा, कफसारखे आजार बळावतात. आजारापासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम कपडे वापरावेत. कोल्ड्रींक्स, डेअरी प्रॉडक्ट खाणे टाळावे. गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -डॉ. यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.
पारा १३ अंशावर; बोचऱ्या थंडीला सुरुवात
By admin | Updated: December 12, 2015 00:36 IST