खेमराज डोये ल्ल आसगावपवनी तालुक्यात विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांकडे शेतावर विद्युतपंप लावले आहेत. मात्र विद्युत पुरवठा होत असलेले जनित्र, तारा, खांबांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.पवनी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन आहे. या कनेक्शनसाठी ज्या तारा टाकण्यात आलेल्या आहेत त्या मागील अनेक महिन्यांपासून लोंबकळत आहेत. काही ठिकाणी तर शेतकरी ज्या शेतात काम करतात त्याच्या डोक्याला हे तार स्पर्श करीत आहेत. काही ठिकाणी खांब झुकलेले आहेत तर ज्याठिकाणी जनित्र बसविण्यात आले आहेत त्यांचे दरवाजे गायब झाले आहेत. याची विद्युत मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही या तारांना उंच करण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धान कापणी, रोवणी, ऊस काढणे व इतर कामे करतेवेळी शेतकऱ्यांना गैरसोयीचे होत आहे. लोंबकळलेल्या तारांमुळे अनेक ऊसाच्या वाळ्या, शेतकऱ्यांचे पुंजण्यांचे शार्टसर्किटमुळे नुकसान झाले आहे.अड्याळच्या पुनरावृत्तीची शक्यताअड्याळ येथील संदीप नवघडे या शेतमजुराचा तुटलेल्या विद्युत तारेला शेतात स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे विद्युत विभागाने लोंबकळलेल्या तारा, वाकलेले खांब, खुले जनित्र यांचे मेंटनन्स करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अड्याळची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. विद्युत मंडळाचा झिरो मेन्टनन्सच्या नावावर विद्युत मंडळाने दुरूस्तीच्या कामावर दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी नसल्याचे कारण सांगून अभियंते वेळ मारून नेत आहेत. दुरूस्तीचे काम करण्यासाठी पवनी तालुक्यात एकच कंत्राटदार असल्याचे सांगितले जात आहे. पवनी तालुक्यात वीज मंडळाचे अड्याळ, कोंढा, कोसरा, खैरी, आसगाव, पवनी ग्रामीण व शहर सात उपविभागीय कनिष्ठ कार्यालये आहेत. आसगाव व खैरी दिवाण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता उपअभियंता मोतनकर व पिंपळकर म्हणाले, डी.सी. आॅफीसला कोणतीही गोष्ट विचारली जात नाही. पवनी तालुक्यासाठी एकच कंत्राटदार असल्याने काम होत नाही. त्यांच्यावर पूर्ण भार आहे. प्रत्येक डी.सी.मध्ये पदांची कमतरता आहे. कमीत कमी २० लोकांचा स्टॉप असावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
विजेच्या तारा लोंबकळलेले, खांबही वाकलेले
By admin | Updated: September 29, 2015 02:12 IST