श्रृती ओहळे यांचे प्रतिपादन : महर्षि विद्या मंदिरात ध्यान साधना शिबिराचा समारोपभंडारा : सूक्ष्म प्रेरणेतून प्राप्त झालेले ज्ञान चिरकाल टिकेल याची शाश्वती नसली तरी भावातीत ध्यानाच्या माध्यमातून मनाला मिळणारा आनंद मनुष्याला सुखी व समृद्ध बनवू शकतो. महर्षी महेश योगी यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे सोपे नाही. भावातीत ध्यानात जीवनाची महत्ता आहे. भावातीत ध्यानाचा वापर करून जीवनात आनंदाची प्राप्ती करावी, असे मार्गदर्शन प्राचार्य श्रृती ओहळे यांनी केले. फुलमोगरा स्थित महर्षि विद्या मंदिरात विश्वशांती अभियान अंतर्गत आयोजित पाच दिवसीय भावातीत योग प्राणायाम उपक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी योगशिक्षक रमेश कावळे, सतीश श्रीवास्तव यांनी ध्यान साधना, भावातीत ज्ञानाचे फायदे, प्राणायाम याबाबत माहिती दिली. या शिबिराचा नागरिकांसह, पालक तथा शाळेतील शिक्षकगण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे महर्षि महेश योगी यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या औचित्याने शाळेच्या सत्रात दर आठवड्याला विद्यार्थ्यांसाठी योग प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत भावातीत ध्यान योग विज्ञाननिष्ठ अभ्यासाचाही समावेश असतो. यासंदर्भात योगशिक्षक रमेश कावळे म्हणाले, महर्षि योगी यांनी संपूर्ण जगाला भावातीत ध्यान आणि आॅर्ट आॅफ लिव्हींग, योग विज्ञानचे महत्व सांगितले आहे. आजच्या तणावयुक्त वातावरणातून मानव सहजपणे सुटका करू शकतो. उत्तम चारित्र्याची निर्मती करण्याचे ‘प्रगाढ’ शक्ती भावातीत ज्ञानात आहे. उत्तम चारित्र्यातून उत्तम नागरिक व त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. समाजात मानवी विकास तर लवकर होतोच तद्वतच समाजसंस्था बळकट होण्यास बळ मिळत असते. महर्षिंनी योग विज्ञानाच्या माध्यमातून माणसिक ताण-तणाव, अन्य व्याधी यावर नियंत्रण मिळविण्याचे गुढ सांगितले आहे. दैनंदिन जीवनात भावातीत ध्यानाचा वापर झालाच पाहिजे, असे आग्रही मतही ओहळे यानी व्यक्त केले. या शिबिरासाठी शिक्षक सतीश श्रीवास्तव, संगीत शिक्षक विनोद पत्थे, अनिता वाघमारे, जयश्री जोशी, प्रज्ञा संगीतवार, संध्या भोवते, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
भावातीत ध्यानात जीवनाची महत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:40 IST