मारहाणीचे प्रकरण : पोलिसांनी जमावाची समजूत काढली भंडारा : येथील लायब्ररी चौकात ज्यांच्यामुळे राडा घडला, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि निर्दोष लोकांवर कारवाई करू नये, या मागणीसाठी आज शुक्रवारला दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास ४० ते ५० महिलांचा जत्था पोलीस ठाण्यात धडकला. अचानकपणे पोलीस ठाण्यात एवढ्या प्रमाणात महिला आल्याने सर्वांच्या नजरा पोलीस ठाण्याकडे वळल्या होत्या. २१ डिसेंबरला लायब्ररी चौकात निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. प्रथम कोण, कुणी हात उगारला याची चर्चा सुरू आहे. मात्र वस्तुस्थिती घटनास्थळी प्रत्यक्षदर्र्शींना माहित होती. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी उशिरा का होईना धरपकड केली. घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत एका गटातील १९ व दुसऱ्या गटातील २० जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले. सर्व जणांना अटक झाल्याची माहितीही प्रसिद्धीला देण्यात आली. वस्तूस्थितीत आजघडीला एका गटातील पाच व दुसऱ्या गटातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे राडा घडला त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या कुटुंबियातील महिलांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचल्या. ४०-५० हून जास्त महिला या जमावात सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात काही घटना तर घडली नाही ना! असा संशय व्यक्त करीत जो तो पोलीस ठाण्याकडे येत होता. यावेळी पोलीस ठाण्यात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरिक्षक जयवंत चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपली बाजू मांडली. पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांची बाजू ऐकून त्यांचे समाधान केले. त्यानंतर महिलांचा जत्था आल्यापावली शांततेत परतला. (प्रतिनिधी) लायब्ररी चौकात सामसुम ४दोन दिवसांपूर्वी लायब्ररी चौकात नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद काल दिवसभर होते. तर आज तिसऱ्या दिवशीही या चौकात सामसूम दिसून आली असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दोन्ही गटाविरूद्ध गुन्हे दाखल ४यादरम्यान दोन्ही गटातर्फे एकमेकांविरूद्ध तक्रारी असल्यामुळे भंडारा पोलिसांनी भादंवि ३२३, ३२४, ३२६, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, सहकलम १३५ महाराष्ट पोलिस कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. या मारहाणप्रकरणी दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, निर्दोषांवर कारवाई होऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली. जखमींवर उपचार सुरू असून तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तपास सुरू असून कायद्यानुसार योग्य ती पाऊले उचलण्यात येईल. - जयवंत चव्हाण, पोलीस निरिक्षक, भंडारा.
शेकडो महिलांचा जत्था पोलीस ठाण्यात धडकला
By admin | Updated: December 24, 2016 02:16 IST