इंद्रपाल कटकवार - भंडारा‘चिंध्या अंथरूण सोने विकायला बसलो ग्राहक फिरकता फिरेना, सोने अंथरूण चिंध्या विकायला बसलो ग्राहक सरता सरेना’ या काव्यपंक्ती अलंकारीक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा कधीकधी प्रत्यय येतो. कष्टाचे पाणी करून दोनवेळच्या भाकरीसाठी वाटेल ते कष्ट सोसणाऱ्यांमध्ये जीवनाची तमा आणि उमेद पाहण्यासारखी आहे. एका रांगेत बसून उदंड आयुष्य विविध प्रकारची फळे विकताना त्यांनी कधी ऊन, वारा व पावसाची तमा बाळगली नाही. वितभर पोट भरून आपल्या पाल्यांना शिक्षण द्यायचे, हीच आस त्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाली. भंडारा शहरातील मिस्कीन टँक तलाव रस्त्यावर एका पंक्तीने फळे विकणाऱ्या आशादायी व्यक्तींची ही छोटेखानी गाथा.मिस्कीन टँक रस्त्याच्या उजव्या हातावर सुखदास बरबरैय्या हे मागील २५ वर्षांपासून सपत्नीक फळविक्रीचा व्यवसाय करीत आहे. घरात एकूण सात सदस्य. चार मुले व एक मुलगी असा परिवाराचा भरणपोषण करण्यासाठी उदंड आयुष्य कष्टात घालविले. एकंदरीत कहार समाजातील मुले जास्त प्रमाणात शिकलेले नाही. सुखदासही अधिक शिकलेले नाही. वडिलांनी हाती दिलेला व्यवसाय अखंडपणे आजही चालवित आहेत. शरीरातील हाडे झिजून गेले असले तरी त्यांचे मन तरूणासारखे आहे. विचार प्रगतीशिल व तेवढेच आशावादी आहेत. आपल्या मुलांनाही त्यांनी आशावाद शिकविला. हरलो तरी सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही, मेहनत करावी, हा मुल मंत्र ते सगळ्यांना देतात. वयाची सत्तरी गाठत असताना त्यांच्यातला जोश वाखाणण्यासारखा आहे. वयाने थकले तरी मनाने ते थकलेले दिसत नाही. आज नैराश्यपोटी कित्येक तरूण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. सुखदास यांना बघून कदाचित असा विचार करणाऱ्यांना आत्महत्या हा शब्दच सुचणार नाही.सुखदास यांच्यासारख्या आपल्या जीवनात गरीबीला डावलून आनंदाची गगण भरारी घेणाऱ्यांमध्ये फुलबसीया दुधबरैय्या, कमलाबाई बादशहा, रुख्मीबाई चंदनबटवे, सेवक भवरीया, श्यामराव चंदनबटवे, सुत्तम चंदनबटवे आदींची प्रामुख्याने नावे घेता येऊ शकतात.
गरीबीच्या मुलामाला आनंदाची जोड
By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST