कोंढा (कोसरा) : आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली, पण कोंढा परिसरात दमदार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या नजरा दररोज आकाशाकडे लागल्या आहेत. अनेकांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावलेले पऱ्हे पावसाअभावी करपत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात शेतकऱ्यांचे मुख्य पीक भात आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुुरुवात केली. अनेकांनी जूनच्या सुरुवातीस पऱ्हे टाकले. मृग नक्षत्रात पेरणीची कामे अनेकांनी आटोपले. आर्द्रा नक्षत्र २२ जूनपासून सुरू झाला तरी आठ दिवसांपासून एखादा पाऊसाचा सिरवा आला, त्या व्यतिरिक्त जोरदार पाऊस न पडल्याने सुरुवातीचे पऱ्हे वाया गेले आहेत. त्यामुळे दुबार पऱ्हे टाकण्याची पाळी अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. दररोज आकाशात ढग जमतात पण पाऊस दमदार येत नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी हात आवळले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी खर्च करणे कमी केले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास जवळील पैसा पुरला पाहिजे म्हणून दुकानातील खरेदीवर हात आखूड केले आहे. किराणा व आवश्यक खरेदी फक्त शेतकरी करताना दिसते आहे. सध्याच्या परिस्थितीचा प्रभाव बाजारपेठावरदेखील झाले आहेत. त्यामुळे सर्वच नागरिक दररोज आकाशाकडे पाहत असून जोरदार पाऊस आल्यास शेतकरी आनंदीत होतील. सध्या मात्र शेतकरी चिंतातुर असून येत्या आठवड्यात जोरदार पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
पावसाअभावी शेतकरी चिंतातुर
By admin | Updated: July 1, 2014 23:22 IST