तहसीलदाराकडून कारवाईस टाळाटाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीलाखनी : तालुक्यातील पालांदूर चौ. जवळ असलेल्या किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांना भूमीधारी हक्काने वहिवाटीकरिता गट नं. ३२४, १०.११ हे. आर. पैकी १.०० हे.आर. शेतजमीन इ.स. १९७५ - ७६ मध्ये सरकारी पट्यासहीत मिळाली असताना गावातीलच एका गर्भश्रीमंत पाटलाने, गरीबी व अडाणीपचाचा फायदा घेवून फर्जी कागदपत्राच्या आधारावर शेतजमिनीवर कब्जा केल्याचे जिल्हाधिकारी भंडारा व उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे प्राप्त पत्रानुसार स्पष्ट झाले असताना सुद्धा तहसीलदार लाखनी यांचे कार्यवाहीच्या प्रतिक्षेत न्यायाची मागणी पीडित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.शासनाकडून सरकारी पट्ट्यासहीत चंद्रभान मारोती हेडाऊ किटाडी यांना मिळालेल्या शेतजमिनीची १७ वर्षे मशागत करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती ओढावून वारंवार नापिकी यातच पीडित शेतकरी हेडावू यांनी प्रकृती खालावल्यामुळे जमिनीतून पिक घेणे अशक्य होवून परिस्थिती गरीब व हालाखीची असल्यामुळे पैशाची अडचण भासून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता व स्वत:चे उपचाराकरिता पैशाची अडचण असल्यामुळे गावातील व पाटील (मयत) प्रभाकर घाटबांधे यांचेकडून काही उसनवारी रक्कम घेतली. पीडित शेतकऱ्याच्या अडचणीचा व अडाणीपणाचा फायदा घेत त्याचे मालकी शेतजमिनीवर कायम स्वरुपी कब्जा करून घेण्याचा कट कारस्थान रचून तसे कागदपत्र तयार करून शेतजमिनीची मशागत करणे सुरु केले. अनेक वेळा शेतजमिनीवरील कब्जा सोडण्याबाबत पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू यांनी विनंती केली असता अरेरावी करून जिवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे हेडावू यांनी तंटामुक्त गाव समितीकडे अर्ज केला असता त्यांनी सुद्धा शेतजमिनी मालक चंद्रभान हेडावू यांना जमीन परत देण्याचा निर्णय दिला. परंतु घाटबांधे यांनी कुठल्याही निर्णयाला न जुमानता सर्व अधिकारी माझ्या खिशात आहेत या वृत्तीला चालना देवून जमीन परत करण्यास नकार दिला. प्रकरण पो.स्टे. पालांदूर चौ. येथे दाखल केले असता कलम १४५ जा.फौ. नुसार दाखल करून सन २००९ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले असता घाटबांधे यांनी पीडित शेतकरी हेडावू यांची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करून बनावट व बेकायदेशिर दस्ताऐवज असल्याचे निर्णय देवून प्रकरण सन २०१४ ला निकाली काढून पुढील कारवाईकरिता तहसीलदार लाखनी यांना आदेश जारी केले. परंतु तहसीलदार यांनी टाळाटाळ करून प्रकरण दाबून ठेवले.पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना प्रत्यक्ष भेटून आपबिती समस्या विशद करून सांगितली असता जिल्हाधिकारी यांनी दि. ६.१०.२०१५ ला तहसीलदार लाखनी यांना कारवाई पूर्ण करण्यासंबंधीचे पत्र दिले असताना सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई न करता न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्यामुळे दोन वर्षापासून आजपर्यंत भूमीधारी हक्काने मिळालेल्या शेतजमिनीच्या न्यायासाठी पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू किटाडी हा प्रतिक्षेतच आहे. या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता पूर्ववत शेतजमिनीचा कब्जा मालकी हक्क असलेल्या हेडावू यांना देण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतजमिनीच्या न्यायासाठी शेतकऱ्याची धडपड
By admin | Updated: May 18, 2016 00:33 IST