करडी (पालोरा) : बोरगाव, कान्हळगाव येथील शेतकरी करडी विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त आहेत. परिसरात कृषी पंपासाठी सिंगल फेज विद्युतचा पुरवठा केला जातो. त्यामउये कृषी पंप वारंवार बंद पडतात. फक्त आठ तास कृषीसाठी विद्युत दिली जात असताना सिंगल फेजमुळे असंतोषात भर पडली आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, त्यांची मदत मिळत नसल्याने सुद्धा शेतकऱ्यांचे दुखणे वाढले आहे.मुंढरी, कान्हळगाव व बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करडी विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वारंवार होत आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नाही. त्यांचा वचक कर्मचाऱ्यांवर नाही. त्यामुळे कर्मचारीही बाहेर गावावरून शहराच्या ठिकाणावरून जाणे येणे करतात. बऱ्याचदा परिसरात फिरकतही नाही. फोनवर सुद्धा 'नॉट रिचेबल' असतात. करडी विद्युत विभागाची जबाबदारी असलेले कनिष् ठ अभियंता सुद्धा कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागत नाही. शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेत नाही. समस्या सांगण्याचा प्रयत्न केल्यास फोन बंद केला जातो. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना विद्युत सेवा नियमित मिळत नाही. त्यांची समस्या ऐकून निराकरण केले जात नाही. ८ तास विद्युत सेवाही बरोबर न मिळता वारंवार खंडीत राहत असल्याने शेताला फटी पडल्या आहेत. पिके हातून जाण्याची संभावना आहे. सध्या तर वारंवार सिंगल फेज लाईनचा पुरवठा होत आहे. कृषी पंप त्यामुळे बंद असतात. विद्युत विभागावर कुणाचेही नियंत्रण नाही.शेतकऱ्यांनी अनेकदा विद्युत कार्यकारी अभियंता परंजपे यांचेकडे तक्रारी केल्या. माहिती दिली. त्यांनी परिसरात प्रत्यक्ष येण्याचे, पाहणी करण्याचे शब्दही दिले. मात्र त्यांनी अजूनही परिसरात पाय ठेवले नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांना विचारणा केल्याचे ऐकीवात नाही. परांजपे साहेबांनी परिसरात यावे, समस्या एकून सोडविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी गणेश धांडे, खेमराज पंचबुद्धे, ईश्वर अतकरी, विष्णू भोयर, भागवत अतकरी, राजेश राऊत, निलेश चामट, संगम सेलोकर, दिलीप अतकरी, सोमा पिंगळे, रविंद्र नखाते, लक्ष्मन बाम्हणे, चंद्रकांत उईके व अन्य शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
सिंगल फेजमुळे शेतकरी त्रस्त
By admin | Updated: September 25, 2014 23:19 IST