प्रकरण भारनियमनाचे : उपोषणाचा चवथा दिवससाकोली : कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे सर्व यासाठी साकोली येथे चार दिवसांपासुन अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे आमरण उपोषण सुरु आहे. आज शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकामधील तिघांनी चक्क नागझिरा रोड साकोली येथील जलकुंभावर चढून विरूगिरी केली.कृषी पंपाचे भारनियमन बंद करावे यासाठी विजवितरण कंपनीसमोर मागील चार दिवसांपासून महिला व पुरुष शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तालुक्यात भारनियमनाचे संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे. मात्र या आंदोलन मंडपाला खा. नाना पटोले, बाळा काशिवार यांनी भेट दिली नाही. समस्याही जाणून घेतल्या नाही. त्यामुळे आंदोलनकाऱ्यांच्या भावना तिव्र झाल्या, परिणामी आज दुपारी अविनाश ब्राम्हणकर, अखिलेश गुप्ता व विनायक देशमुख या तिघांनी जलकुंभावर चढुन शासन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात नारेबाजी सुरु केली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. चर्चेच्या माध्यमातून जलकुंभावर चढलेल्या आंदोलकांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेला यश आले नाही. परिस्थिती सांभाळण्यासाठी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार मडावी हे स्वत: जलकुंभावर चढून आंदोलनकारीची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या वरिष्ठापर्यंत पोहचवून तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावर आंदोलक चार तासांनी जलकुंभावर उतरले. तसेच पुन्हा वीज कार्याल्यासमोर सुरु असलेल्या मंडपात जाऊन आमरण उपोषण सुरु केले. शहरात मात्र आंदोलनकर्त्यांच्या विरूगीरीची चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलकांची विरूगिरी
By admin | Updated: February 27, 2017 00:26 IST