साकोली : डाळीचे भाव कमी करा व शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे साकोलीत आज धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.धानाला योग्य भाव मिळावा व खरीप धानावर किडीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आणेवारी ५० पैशापेक्षा कमी करण्यात यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये मोबदला द्यावा, तुरीच्या डाळीचे भाव कमी करुन बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्यात यावे, शेतीसाठी डिझेलचे भाव ५० टक्के कमी करण्यात यावे, धानाचे हमीभाव केंद्र सुरु करावे, बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, भीमलकसा प्रकरणाचे काम सुरु करण्यात यावे, रोजगार हमी योजनेचे आठ महिन्याचे देयक सुरु करण्यात यावे, गैर आदिवासींना संरक्षण देणारा परिपत्रक रद्द करून खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा, केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून पूर्ववत राशन पुरविण्यात यावे, मनरेगा अंतर्गत शेतीची व तलावाचे कामे करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, रेखा वासनिक, चुन्नीलाल वासनिक, मंदा गणवीर, तालुकाध्यक्ष नंदकिशोर समरीत, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, निर्मला कापगते, विजय दुबे, ओम गायकवाड, उमेश भुरे, ताराबाई तरजुले, पंचायत समिती सदस्य छाया पटले, नरेश बेलेकर, निनाद राऊत, बाळकृष्ण हटनागर, जे.डी. मेश्राम, प्रकाश करंजेकर, विनायक देशमुख, जगन रहांगडाले, जनार्धन डोंगरवार, दिपक थानथराटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत काँग्रेसची धरणे
By admin | Updated: October 29, 2015 01:00 IST