बाराभाटी : मागील एक महिन्यापासून दररोज शहरी व ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे महत्त्वाची कामे खोळंबत असून या फटका सर्वसामान्यांवर पडत आहे.तालुक्याच्या मुख्य भागामध्ये विद्युत पुरवठा करणारे पॉवर हॉऊस (डी.सी.) बसविलेले आहे. अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध या ठिकाणांहून परिसरात वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सततच्या विजेच्या लपंडावामागे काय कारण आहे, ते कळू शकले नाही. सहायक अभियंता तक्रार करणाऱ्या ग्राहकांना उलटसुलट उत्तर देवून त्यांना दबावात आणतात. या प्रकाराकडे वीज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नसून त्यांचे वचकसुद्धा नसल्याचे दिसत आहे.विजेच्या लपंडावामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची आॅनलाईन कामे होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत नाही. त्यांची महत्त्वाची कामे होत नाही, परिसर मागासलेलाच राहतो. परंतु श्रीमंतीचा दर्जा ठेवणारे नागरिक व राजकारणातील नेते लोकांच्या राईल मिल रात्रंदिवस सुरु असतात. सार्वजनिक ठिकाणचे समाजमंदिर, मनोरंजन केंद्र, मंदिरातील सार्वजनिक वीज खुलेआम रात्रंदिवस सुरू राहते. त्याचा भुर्दंडही सर्वसामान्य जनतेवर पडतो. विजेचा बिल मोठ्या प्रमाणात येवूनही नागरिकांना तो भरावाच लागतो. विजेचा लपंडाव बंद झाला नाही तर अभियंता, विद्युत कार्यालय, अर्जुनी-मोरगाव येथे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या समस्येकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
विजेचा लपंडावाने नागरिक झाले त्रस्त
By admin | Updated: March 29, 2015 00:59 IST