भंडारा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४२ नुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेतजमिनीचा वापर अकृषक प्रयोजनासाठी करता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४४ नुसार अकृषक परवानगी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.कलम ६४ प्रमाणे राज्यातील सर्व जमिनी (कलम ११७ अन्वये सुट दिलेल्या जमिनी वगळता) जमीन महसूल देण्यात पात्र असतात. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अनागरी भागातील वैयक्तिक निवासी वापराखालील इमारतीमधील वाणिज्य वापरास अकृषक परवानगी घेण्यामधून सूट याबाबत १३ जून २०१२ रोजी शासन निर्णय जाहीर केलेले आहे. त्याअन्वये नगरेत्तर क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीचा वापर वैयक्तिक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनासाठी करता येईल. नगरेत्तर क्षेत्रात वैयक्तिक खऱ्याखुऱ्या वापराखालील असलेल्या अशा जागांमध्ये चाळीस चौरस मिटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ नसलेल्या जागेत सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम २००६ यांच्या कलम २ च्या खंड (ज) व्याख्या केलेल्या सूक्ष्म उपक्रमाच्या वापरासाठी करता येईल. यामध्ये दुकान, पिठाणी गिरणी, किराणा दुकान किंवा मिरची कांडप यंत्र या सारख्या लघु वाणिज्यिक वापरात, रुपांतर करण्यासाठी अशा परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतु सुुक्ष्म उपक्रमाकरीता आणि अशा लघु वाणिज्यिक प्रयोजनाकरिता जागांचा वापर करणारी व चाळीस चौरस मीटरपेक्षा अधिक नसलेले क्षेत्र अशा उद्देशासाठी व्यापणारी व्यक्ती, ज्या दिनांकास जमिनीच्या वापरात अशा बदल करील त्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत विहित करण्यात येईल अशा नमुन्यात ग्राम अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदाराला असा बदल केल्याच्या दिनांकाची सूचना देईल. तसेच इतर माहिती सादर करील आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकाऱ्याला देखील अग्रेषित करील. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)
पूर्वपरवानगीशिवाय शेतजमिनीचा वापर अकृषक प्रयोजनासाठी करु नये
By admin | Updated: June 15, 2014 23:23 IST