पत्रपरिषद : जिल्हा शल्यचिकित्सक पातुरकर यांची माहितीभंडारा : जिल्ह्यात मधुमेहाच्या संदर्भात १ लक्ष २२ हजार २६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात मधूमेहाचे संशयीत १२ हजार ६५६ रुग्ण तर खात्री झालेल्या रुग्णाची संख्या ४ हजार ६२० आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर यांनी दिली. राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन व १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधूमेह दिनानिमित्त कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्र परिषदेत डॉ. पातूरकर बोलत होते. यावेळी डॉ. आर.डब्ल्यु. कांबळे, डॉ. शैलेश कुकडे, प्रियंका मिश्रा (वित्तीय व पुरवठा सल्लागार)व अन्य अधिकारी उपस्थित होते.डॉ. पातुरकर म्हणाले, शरीरातील पेशींची अनियंत्रीत वाढ म्हणजे कर्करोग होय. कर्करोग हा शरीराच्या कोणत्याही अवयवाला होवू शकतो. मुख्यत: मुख, स्तन व गर्भाशयाचे कर्करोग अतिप्रमाणात आढळतात. देशात पुरूषांमध्ये ४८ टक्के तर स्त्रीयांमध्ये २० टक्के कर्करोग हे तंबाखूमुळे होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ७ नोव्हेंबरला राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस साजरा केला जातो.जिल्ह्यात मागील ३ वर्षात काही कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण कर्करुग्णांची संख्या ८१ इतकी आहे. जिल्ह्यात मधूमेह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी मधूमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही आढळून येते. तंबाखूचे सेवन टाळने व आवश्यकवेळी आरोग्य सेवेचा तात्काळ लाभ घेतल्यास कर्करोगावर नियंत्रण मिळविता येतो. मधुमेहासंदर्भात, शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण इन्सुलिन नावाच्या हार्मोनद्वारे नियंत्रित केले जाते. इन्सुलिनचे शरीरातील उत्पादन कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. भारतात दर एक हजार लोकसंख्येत मधुमेहाचे ६२.४७ रूग्ण आढळतात. मिठ व तेलकट पदार्थाचे सेवन करू नये, शितपेय व फास्टफुड अतिप्रमाणात सेवन करू नये, रोज व्यायाम करणे, संतुलीत आहार घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळविता येते. दि.१४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येणार असल्याचेही डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात मधुमेहाचे संशयित १२,६५६ रूग्ण
By admin | Updated: November 11, 2015 00:33 IST