साकोली : साकोली परिक्षेत्र नक्षलग्रस्त असूनही २० तास वीजपुरवठा का नाही, शेकडोंच्यावर शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना वीजजोडणी मिळाली नाही. यासह वीज जोडणी करू नका या मागणीला घेऊन भाजप किसान आघाडीतर्फे साकोली विद्युत मंडळ कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा नेण्यात आला.
लॉकडाऊनमध्ये शेतकरी चिंतातुर व आर्थिक संकटाचा सामना करीत असून विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी कापण्याच्या धमक्या दिल्या जातात. लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिले माफ करण्यात येतील, असे शासनाकडून संकेत होते. पण याउलट भरमसाट वीजबिले लादून सामान्य शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याच्या व वीज कापण्याच्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. या रास्त मागणीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ साकोली कार्यालयावर शेतकऱ्यांसह भाजप किसान आघाडीने धडक देत स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले. मागण्यांची दखल न घेतल्यास भाजपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या वेळी अविनाश ब्राह्मणकर, डॉ. अजय तुमसरे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, इंद्रायणी कापगते, लखन बर्वे, मनिष कापगते, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे, सरपंच प्रेमकुमार गहाणे, तुकाराम खरकाटे, देवेंद्र लांजेवार, रवींद्र खंडाळकर, शारदा लांजेवार, राजश्री मुंगुलमारे, नरेंद्र वाडीभस्मे, किशोर पोगडे, नितीन खेडीकर, वनिता डोये, भुमिता धकाते, उषा डोंगरवार आदी उपस्थित होते.