पक्षिप्रेमींनी व्यक्त केली भीती : उपाययोजना करण्याची मागणी पवनी : तालुक्यात गोसीखुर्द धरण, वैनगंगा नदी, वाही जलाशय व इतर तलावांवर १५ दिवसांपासून स्थलांतरीत पक्षी आले आहेत. पण या स्थलांतरीत पक्ष्यांच्या शिकारी होत असल्यामुळे भविष्यात येथे येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांच्या संख्येत मोठी घट होण्याची भिती पक्षीप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.वातावरणाच्या दृष्टीकोनातून सायबेरीया, मंगोलीया, कझागीस्तान, रशीया, तिबेट, काश्मीर मधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षांचे इकडे येणे सुरु होते. दोन ते चार महिने इकडे वास्तव्य करुन परत पुढच्या प्रवासाला हे पक्षी निघून जातात. हा पक्षांचा क्रम अनेक शतकांपासून सुरु आहे तो आजही सुरु आहे.पाहुणे म्ळणून आलेल्या या स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्तव्य तालुक्यातील गोसीखुर्द धरण, वैनगंगा नदी, वाही जलाशय व अनेक तलावावर आढळून आले आहे. पण या स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट ही फार चिंतेची बाब आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. हे स्थलांतरीत पक्षी समूह थव्याने वास्तव्यास असतात.या स्थलांतरीत पक्ष्यांची अतिशय निर्दयतेने शिकार केली जाते. या कधी फास्यामध्ये पकडून तर कधी पाणवठ्यात नुवाक्रान हे विष दाण्यामध्ये मिसळून या पक्ष्यांना खाऊ घालून मारल्या जाते. हे पक्षी थव्याने राहत असल्यामुळे मोठ्या संख्येने मारले जातात. या पक्ष्यांना पकडून कधी बाजारात विक्रीसाठी आणले जाते. त्यामुळे या स्थलांतरीत पक्षांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी पक्षी प्रेमींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
शिकारींमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट
By admin | Updated: March 13, 2016 00:29 IST