खराशी : शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली, मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे.अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाणांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहे. यासाठी किटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे भाजी, फळे इत्यादी विषाक्त होत आहे. सर्व पिकांवर उत्पादनाच्या दृष्टीने फवारणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत.देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणाला गरजच वाटत नाही. काही कालावधित आधुनिक शेतीमुळे भरघोष उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धानाचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.विशेष म्हणजे रसायनांचे दूष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरून जास्तीत जास्त फायदा व्हावा, या संकल्पनेतून सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. आता सेंद्रीय खतांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या खतासंदर्भातही शेतकरी अनभिज्ञ आहे. काही ठिकाणी या शेतीचा वापर करून केवळ व्यापारी नफा मिळवित असल्याचे दिसते. त्यामुळे या आधुनिक शेतीच्या नादात जमिनीचा कस कमी घेवून शेतात विषाचीच फवारणी होत असल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)
शेत जमिनीचा कस झाला कमी
By admin | Updated: January 11, 2015 22:46 IST