जुन्या पुलावरून धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 09:31 PM2019-03-17T21:31:23+5:302019-03-17T21:31:57+5:30
वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.
वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल तयार करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक याच नवीन पुलावरून होत असते. परंतु, नवीन पूल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुकीस सुरू आहे.
आॅगस्ट २०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईप टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना आवागमन करण्यास जुना पूल सोयीचा होत असल्याने लोखंडी पाईप काढण्यात आले.
सध्या या पुलावरुन जड वाहतूक बंद असली तरी पादचारी व दुचाकींची वाहतूक सुरू आहे. ९० वर्ष वयोमान झालेल्या या पुलाचे लोखंडी कठडे जीर्ण झाले आहेत. कधी-कधी या कठड्यांना एकमेकांसोबत तारांनी जोडले जाते. रात्रीला या पुलावर सर्वत्र अंधार असतो.
चार वर्षापूर्वी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहन जुन्या पूलावरून नदीत कोसळले होते. यात वाहनातील सर्वांनाच जलसमाधी मिळाली होती. या पुलावरुन धोकादायक वाहतूक सुरू असून महाड व मुंबईसारख्या घटनांची पुनरावृत्तीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.