पवनी : स्वतंत्र भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे़ देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला मरणासन्नाचे जीवन जगत असल्याचे चित्र आहे़ गत महिन्याभरात दोन वेळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्यात वावरत आहे़ दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाच्या छायेत वावरणारा शेतकरी स्पयंपूर्ण होऊ शकला नाही, हे दुर्देव आहे़ जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हलाखीचे जीवन जगताना दिसत आहे़ दिवसेंदिवस कर्जाचे ओझे वाढत आहे़ दिवस-रात्र शेतीमध्ये घाम गाळणाऱ्या धान उत्पादकांच्या नशिबिी मात्र कर्जाच्या अभिशापाचे वरदान तर नाही ना, असे म्हणावे लागत आहे़ शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या सातत्याने पाठलाग करीत आहेत़ धान उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली जात नाही़ धान उत्पादक शेतकरी कोणत्याही कष्टाची पर्वा न करता शेतीमध्ये राबतो़ उभे आयुष्य शेतीच्या मशागतीमध्ये खर्ची घालणाऱ्या शेतकऱ्यांना थोडीशीही उसंत मिळत नाही़ देशातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा धान उत्पादक शेतकरी पूर्णत: मानसिकरीत्या खचून जाऊन दुर्बळ झाल्याचे दिसून येत आहे़ एकमेव शेतीच्या मुख्य व्यवसायावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येते़ स्वत:ची जबाबदारी पेलनाता मात्र त्याला अति कष्ट सहन करावे लागते़ तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता आपल्या कुटूंबासमवेत शेतीमध्ये दिवसभर घाम गाळण्यातच स्वत:ला धन्य मानतो़ काही वर्षापूर्वी धानाची शेती परवडणारी होती़ धान उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या इतर पूरक वस्तूंच्या किमती दामदुपटीने वाढल्या़ पर्यायाने धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झालेली आहे़ त्या मानाने धानाला भाव मिळत नाही़ ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल़ (तालुका प्रतिनिधी)
धान उत्पादकांच्या नशिबी कर्जाचा शाप
By admin | Updated: April 1, 2015 00:40 IST