दीड तास कर्मचारी नजर कैदेत : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रमभंडारा : ग्रामीण जनतेशी थेट नाड जुडून असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी कर्तव्यावर येतात खरे. पण, काही वेळातच चहाटपरी किंवा पानखर्रा खाण्यासाठी कक्षाबाहेर पडतात. यामुळे कामासाठी येणाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे कर्मचाऱ्यांवर चाप बसावा, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी लगाम लावण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषद इमारतीला मुख्य प्रवेश द्वाराव्यतिरिक्त तीन आणखी दार आहेत. एक दार आरोग्य विभागालगत, दुसरे द्वार जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षालगत तर तिसरे द्वार वित्त विभागाच्या बाजूला आहे. चार द्वार असलेल्या जिल्हा परिषदेत कृषी, सिंचाई, शिक्षण, बांधकाम, पंचायत, आरोग्य, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी व पशुसंवर्धन, वित्त, महिला व बालकल्याण या महत्वपूर्ण विभागासोबतच अन्य विभागाही आहेत. जिल्हा परिषदेत सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.येथील कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजताची असून कार्यालय बंद होण्याची वेळ सायंकाळी ५.७५ आहे. कर्मचारी वेळेत उपस्थित राहून त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे निभवावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बायोमेट्रीक मशिन लावली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना चाप बसला. जे कर्मचारी नित्याने बाहेरगावाहून जाणे-येणे करीत होते. ते वेळेत कार्यालयात उपस्थित राहू लागले. मात्र, यातील अनेक कर्मचारी बायोमेट्रीक मशिनवर अंगठा लावल्यावर त्यांच्या हातातील फाईल किंवा टिफिनची बॅग ठेवलवर ठेवून थेट चहाटपरी किंवा पानखर्रा खाण्यासाठी बाहेर पडत होते. यात ते जवळपास तासभर बाहेर बसत होते. त्यामुळे पहिल्या सत्रात बाहेरगावाहून येणारे नागरिक कर्मचाऱ्यांची वाट बघत ताटकळत बसून राहत होते. ही बाब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी हेरली. कामापासून दुर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण बसावे, यासाठी त्यांनी जिल्हा परिषदचा मुख्य द्वार वगळता अन्य तीन दारांना सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुलूपबंद करण्यात येते. यामुळे येथील कर्मचारी पहिल्या सत्रात कक्षाबाहेर जाण्यावर चाप बसला आहे. यासाठी सीईओंनी एक रजिस्टरधारक कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर बसविलेला आहे. तो बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांंची नोंद करतो. सोबतच या कर्मचाऱ्यावर नियंत्रण बसविता यावे, यासाठी एका सीसीटीव्ही कॅमेराची नजर असते. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सीईओंची स्तुती केली तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)
सीईओंचा जि.प. कर्मचाऱ्यांना चाप
By admin | Updated: January 3, 2015 22:55 IST