काटेबाम्हणी शिवारातील प्रकार : प्रकल्प अधिकारी अनभिज्ञतुमसर : बावनथडी प्रकल्पाचा कालवा फोडून एका दुग्ध व्यवसायीकाने रासायनिक द्रव्यमिश्रीत पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देणे सुरु आहे. या रासायनिक पाण्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या पाळीव जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. येथे शेतजमिनी नापिकी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते.तुमसर - रामटेक राज्य महामार्गाशेजारी काटेबाम्हणी - खापा शिवारात एका दुग्ध व्यवसायीकाचा दूध कारखाना आहे. दूध खरेदी करून त्याच्यावर या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. यामुळे दूध जास्त वेळ टिकण्यास मदत मिळते. कोट्यवधींच्या या कारखान्यात दुधावर रासायनिक प्रक्रिया केल्यावर निरुपयोगी रसायनमिश्रीत पाणी कारखान्याच्या बाहेर एका नालीद्वारे सुमारे १०० ते १२५ मिटरपर्यंत नेले जाते. या नालीजवळच बावनथडीचा मोठा कालवा आहे. या कालव्यात अंतर्गत समांतर प्लास्टीक पाईप घालण्यात आले आहे. प्रकल्पाला कालव्याचे लाईनिंग फोडून रसायनमिश्रीत पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. सध्या बावनथडी प्रकल्पातून शेतीच्या सिंचनाकरिता पाणी सोडले आहे. रसायनमिश्रीत पाणी कालव्याच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे शेतकरी व त्यांची पाळीव जनावरे पाणी पीत असल्याने पीक तथा जनावरे व शेतजमिनीला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. यात कालवा अधिकाऱ्यांनी कारखानदाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे. कालवा फोडून रसायनमिश्रीत पाणी सोडण्यासाठी विभागाने परवानगी दिली आहे काय यावर कुणीच सांगायला तयार नाही.(तालुका प्रतिनिधी)
कालवा फोडला
By admin | Updated: October 29, 2015 00:45 IST