दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात : आरोग्य विभागाने सूचना देऊनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्षकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे काविळ या आजाराची साथ सुरु आहे. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना ग्रामपंचायतने चुप्पी साधून आहेत. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार वाढल्याचे पत्र आरोग्य यंत्रणेने ग्रामपंचायतीला देऊनही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मोहाडी तालुक्यातील ५000 लोकसंख्येचे करडी गाव जलजन्य आजाराने ग्रासले आहे. प्रत्येक वॉर्डात रुग्ण आहेत. सर्व रुग्ण दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आजारी आहेत. काही रुग्ण करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही रुग्ण खासगी उपचार घेत आहेत. भंडारा व नागपूर येथील रुग्णालयातसुद्धा रुग्ण भरती आहेत. मागील आठवड्यापासून जलजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ग्रामपंचायतने उपाययोजना केली नाही. दोन आठवड्यापासून दूषित पाण्यामुळे विविध आजारांची साथ सुरु आहे. पहिल्या आठवड्यात उलटी, हगवण आजाराचे रुग्ण अधिक दिसून आले. दुसर्या आठवड्यापासून ताप, विषमज्वर व काविळचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहेत. येथे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जिल्हा परिषद हायस्कूलजवळील पाण्याच्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र अनेक महिन्यांपासून पाण्याची टाकी धुतली जात नाही. पाण्यात क्लोरिनेशन केले जात नाही. सार्वजनिक व खासगी विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर येत नाहीत. नागरिकांच्या आरोग्याशी त्यांचे देणे घेणे नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे दूषित पाणी पाईप लाईनमध्ये शिरते. नागरिकांनी अंगणात खड्डे खोदले आहेत. खड्यांमध्ये साचलेले पाणी परत पाईप लाईनमध्ये जाते. त्यामुळे संपूर्ण गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. (वार्ताहर)
करडी येथे काविळचा प्रकोप
By admin | Updated: June 9, 2014 23:26 IST