भंडारा : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य म हामार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. भंडारा व वरठी रेल्वे स्टेशन या स्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून भंडारा येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या असून शाळांना सुट्या लागल्या आहे. परिणामी मंगळवार बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासून विविध मार्गावर जाणाऱ्या बससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकीटासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. भंडारा बसस्थाकावरून अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाऱ्यांची संख्या यादिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा मंगळवारी बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या भंडारा आगाराच्या वतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे सामान व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे. तिथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रवाशांच्या आवागमनाने बसस्थानके फुलली
By admin | Updated: October 21, 2014 22:46 IST