अधीक्षक अभियंत्यांना निवेदन : गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांची कैफियतभंडारा : उन्हाची रखरखता वाढत चालली असताना निसर्गासोबतच वीज पुरवठा कंपनी ही नागरिकांवर कोपल्याचे दिसून येत आहे. उष्णता व भारनियमन या दोन्हीच्या कचाट्यात ग्रामीण जनता होरपळत आहे. १६ तासांच्या वीजपुरवठा करावा, या मागणींसाठी गणेशपूर जि. प. क्षेत्रातील शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता मडावी यांना निवेदन दिले.मे हिटची प्रचिती सध्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एप्रिल महिन्यातच अनुभवाला मिळत आहे. गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर, बेला, पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी यासह अन्य गावात वीज वितरण कंपणीच्यावतीने पुरवठा होणारी वीज अत्यल्प आहे. या तासाचा विद्युत पुरवठा व १६ तासाचे भारनियमन अशी परिस्थिती या परिसरातील नागरिकांना सहन करावे लागत आहे. त्यातही तांत्रीक अडचणीमुळे सिंगल फेसवर विद्युत पुरवठा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याबाबत गणेशपूर ग्रामपंचायत उपसरपंच तथा शिवसेना नेते यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता मडावी यांना निवेदन देण्यात आले. यात परिसरातील नागरिकांना १६ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. भारनियमन बंद न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शिष्टमंडळात भास्कर साठवणे, गुलाब सेलोकर, यशंवत साठवणे, कुथे, झामदेव आतीलकर, बंडू बडवाईक, हरिशंचद्र दिवटे, अंताराम मेश्राम, शेखर साठवणे, परसराम साठवणे, सुरेश दिवटे, रामभाऊ साठवणे, घनश्याम साठवणे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
भारनियमनाने ‘होरपळतेय’ जनता
By admin | Updated: April 23, 2016 00:40 IST