लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीउपयोगी तसेच दुधाळ जनावरांच्या गुरांच्या खरेदी-विक्रीची लगबग वाढली आहे. भंडारा शहरातील रविवारचा गुरांचा बाजार चांगलाच कडाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बाजारात जनावरांच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वधारल्या आहेत.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. अलीकडे ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी बैलजोड्यांच्या मदतीने शेती अनेकजण करतात. रविवारला भंडारा शहरातील गुरांच्या बाजारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. शेती उपयोगी ५० हजारांत मिळणारी बैलजोडी वय व योग्यतेनुसार ५५ हजार ते ६० हजारांच्या किमतीत विकली गेली. दुधाळ संकरीत गायीसुद्धा ४० ते ५० हजारांपर्यंत विकल्या गेल्या. म्हशींच्या बाजारात मात्र फारशी तेजी दिसून आली नाही.
क्षमता व देखण्या बांध्यानुसार किमतशेतकरी बैलजोडी निवडताना बैलांची ताकद, वय, वजन आणि शारीरिक बांधणी व आरोग्याचा बारकाईने विचार करतात. नांगरणी, पेरणी, तणस व गवत वाहतूक तसेच अन्य शेतीकामासाठी बैलजोडीचा उपयोग होतो. तरुण व शारीरिक मजबुती असलेल्या बैलजोड्यांना मागणी दिसून आली. त्यासाठी अधिक किमत मोजावी लागली.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेजिल्ह्यात अनेक शेतकरी शेतीचा हंगाम आटोपताच पालनपोषण करण्याचा त्रास वाचविण्यासाठी बैलजोडी विकतात तर हंगामाच्या प्रारंभी खरेदी करतात. यंदा हंगाम १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू झाल्याने बैलबाजारात खरेदी-विक्रीची धावपळ दिसून आली परंतु, बैलजोडी खरेदी करताना अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याची चर्चा बाजारात दिसून आली.
"खुल्या शेतात ट्रॅक्टर चालवणे सोयीचे असते. पण पावसाळ्यातील अधिक ओलाव्यामुळे भाजीपाला पिकात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. त्याच ट्रॅक्टरचे दर वाढल्याने अनेकांना बैलजोडीशिवाय पर्याय नसतो, परंतु आता बैलजोडीचा भाव वधारल्याने पेरणीचा खर्च वाढणार आहे. "- घनशाम आगासे, शेतकरी, निलज.