ब्रह्मानंद करंजेकर यांची मागणी भंडारा : गरजेच्या वेळी हुलकावणी आणि गरज नसताना हजेरी लावणाऱ्या भुलभुलैय्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. आताच्या या पावसाने जड धानाला फायदा होणार असला तरी हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे.सिंचनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आॅगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला. आता आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे किडीचा प्रकोप वाढला आहे. धानपिकांवर लष्करी अळी, तुळतुळा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने किटकनाशके व औषधी विनामुल्य देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट ओढवले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतीला पाणी केव्हा द्यायचे, खायचे केव्हा आणि झोपायचे केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून धानाला ३,५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर देण्याची मागणीही जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
By admin | Updated: September 27, 2016 00:31 IST