आधारसोबत जोडणार : पालकांना कळणार माहिती भंडारा : राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता संपूर्ण राज्यातील शाळेमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघताच त्यांची लिंक देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ई-लर्निंगद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या शासन निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.राज्यात २०११ साली पटपडताळणी झाल्यावर अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखविण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्या नोंदणीसाठी 'डाइज'चा उपयोग केला. यात राज्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी आपली विद्यार्थीसंख्या, शिक्षक आणि शाळांची माहिती टाकणे अनिवार्य करण्यात आले. याशिवाय राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगवर भर देण्यात आला. यातूनच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम शाळास्तरावर २७ जूनपर्यंत राबविण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, यादरम्यान शाळा बंद असल्याने मोहीम बंद करण्यात आली. आता शाळा सुरू होताच ही मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड येताच शिक्षकांकडून हजेरीचे काम काढण्यात येईल. कार्यालयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी शाळेत लावलेल्या 'बायोमेट्रिक मशीन'द्वारे करण्यात येईल. तसेच त्याला आधार कार्ड लिंक करण्यात येईल. शाळेत येताच विद्यार्थ्याला आधार कार्ड त्या मशीनला दाखवावे लागेल. याशिवाय याची लिंक पालकांच्या मोबाईलवर देण्यात आल्याने विद्यार्थी शाळेत येताच, पालकांना त्याची माहिती मिळेल. यंदापासूनच हा प्रकल्प सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)
शाळांमध्ये 'बायोमेट्रिक' हजेरी
By admin | Updated: June 9, 2015 00:52 IST