अड्याळ : सततच्या नापिकीमुळे आधीच मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजिवनी मिळावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी या अन्य मागण्यांसाठी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अड्याळ परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी व त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलून तातडीने मदतीचा हात द्यावा व प्रत्येक शेतकऱ्यांना १०० टक्के नापिकीची घोषणा करून १०० टक्के नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, कमी पावसामुळे करपलेल्या धानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक २२ हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांचे पीक गेले त्यांना शासनाकडून मोफत बियाणे देण्यात यावे, नेरला उपसा सिंचन योजना त्वरीत चालू करण्यात यावी, गावस्तरावर दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांकडे पंप आहे अशा शेतकऱ्यांचे विद्युत बील माफ करावे व भारनियमन बंद करण्यात यावे, अड्याळ परिसरात ३0 ते ३५ टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यांचेही सर्व्हे करण्यात यावे अशा सर्व मागण्या घेऊन शिवसेनेच्या वतीने दुपारी १२ वाजता नायब तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना व परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार वाकलेकर तसेच आ. अवसरे यांना निवेदन दिले. आ. अवसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश मानापुरे, तालुका अध्यक्ष विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, गिरधर कोहपरे, निवृत्ती गभणे, भोजराज गभणे, मधुकर गभणे व परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर झाँकी मोर्चा दरम्यान काढली होती. कायदा व सुव्यवस्था प्रस्तापित राखण्यासाठी ठाणेदार नेवारे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. नायब तहसीलदारांना निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची रितसर सांगता करण्यात आली. (वार्ताहर)
तहसील कार्यालयावर ‘बैलबंडी मोर्चा’
By admin | Updated: November 6, 2014 22:50 IST