भंडारा : शासनाने घोषित केलेल्या अनलाॅक प्रक्रियेच्या आदेशाची जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असून शनिवारी सायंकाळपर्यंत हा आदेश निर्गमित करण्यात आला नव्हता. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. २८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असुन ३३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
शासनाने घोषित केलेल्या लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्प्याचे निकष घोषित करण्यात आले आहेत. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याचे आदेश निर्गमित करणार आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत भंडारा जिल्ह्यात याबाबतचे आदेश निर्गमित झाले नव्हते. त्यामुळे काय सुरू राहणार व काय बंद राहणार हे कळायला मार्ग नाही. सोमवारपासून अनलाॅक प्रक्रिया सुरु होणार असून सूत्रानुसार भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या ४.४१ टक्के आहे. त्यानुसार भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात येत असल्याची माहिती आहे. सर्वांना या आदेशाची प्रतीक्षा आहे.
शनिवारी १००७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ७, लाखनी १०, साकोली ९, तुमसर ५ आणि मोहाडी तालुक्यात २ असे ३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी २८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या ५७ हजार २९२ झाली आहे. शनिवारी कोरोनाने कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नसून आतापर्यंत कोरोनाचे १०५५ बळी गेले आहेत.
बाॅक्स
८१७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून त्यासोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. शनिवारी जिल्ह्यात ८१७ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यात भंडारा १२५, मोहाडी ३९, तुमसर ४१, पवनी २५, लाखनी ५७, साकोली ४९२, लाखांदूर ३८ रुग्णांचा समावेश आहे.