पालोरा (चौ.) : मागील वर्षी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यत आर्थिक मदत पोहोचली नाही. यासंदर्भात आझाद शेतकरी संघटनानी पुढाकार घेतला असून रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकाविरुध्द कारवाईची मागणी केली आहे.मागील वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे आर्थिक मदतची मंजुरी दिली. शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. मात्र वर्ष लोटूनही बँकेत रक्कम जमा झाली नाही. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार म्हणतात, बँकेत जा. बँक व्यवस्थापक म्हणतात, तहसील कार्यालयात जा. त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होऊ लागली. ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते नंबर दिले नाही, त्यांची रक्कम शासनाने परत जमा करण्याचे ठरविले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. खाते नंबर देऊनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. आझाद शेतकरी संघटनेच्या पुढाकारामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्तांची रक्कम देण्यास बँकेकडून टाळाटाळ
By admin | Updated: November 23, 2014 23:14 IST