मोहाडी : जवळील मोहगाव देवी येथील तिरुपती राईस मिल मालकाने शेतकऱ्यांजवळून लाखो रुपयांचे धान खरेदी केले. धानाचे पैसे आज देतो, उद्या देतो अशी टाळाटाळ करून आता राईस मिल मालक विजय खोब्रागडे याने मोहगाव येथील राईस मिल येथे येणेच बंद केले असून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास नकार दिल्याने येथील अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली असून पोलीस तपासही संथगतीने सुरु असल्याची खंत शेतकऱ्यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली असून धानाचे पैसे मिळवून देण्याची मागणी केली आहे.मोहगाव देवी येथे विजय खोब्रागडे यांची राईस मिल आहे. तांदळाचा व्यवसाय करण्यासाठी विजय खोब्रागडे यांनी मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांकडून उधारीवर धान खरेदी केली. धानाचे तांदूळ बनवून त्याने बाहेर विक्रीही केली. मात्र खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकऱ्यांना आजपर्यंत दिले नाही. धानाचे भाव कमी आहेत, भाव वाढल्यावर तुमच्या धानाची विक्री करून जास्त मोबदला देण्यात येईल असे थापा मारून मिल मालकाने वेळ मारून नेली आणि नंतर संपूर्ण राईसमिलच बंद केली. आताही तिरुपती राईस मिल बंद अवस्थेतच आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पैशासाठी राईस मिल मालकाकडे तकादा लावला असता त्याने उलट सुलट उत्तर देण्यास सुरुवात केली व आता भटकनेही बंद केले. दूरध्वनीवर पैशाची मागणी केली असता शेतकऱ्यांना धमकाविण्याचे काम सुरु केले आहे. मोहगाव येथील राजेश लेढे यांचे ५ लक्ष, शशीमोहन काळे यांचे ३ लक्ष २५ हजार रुपये, राजीराम वाडीभस्मे यांचे ५० हजार रुपये, ज्ञानेश्वर वाडीभस्मे यांचे ३५ हजार, वसंता लेंढे यांचे ७० हजार रुपये, किशोर लेंढे यांचे १५ हजार, मधू साठवणे यांचे ४ लक्ष, विकास बांडेबुचे यांचे १ लक्ष ७५ हजार, माणिकराव साठवणे यांचे १ लक्ष १० हजार, विकास साठवणे यांचे ७७ हजार ५५० रुपये व इतर अनेक शेतकऱ्यांचे मिळून एकुण २० ते २५ लक्ष रुपये राईस मिल मालकाकडे थकीत आहेत. विकास साठवणे यांना ७७ हजार रुपयांचा चेक विजय खोब्रागडे यांनी दिला होता. मात्र तो चेक बाऊंस आला. मोहगाव ग्रामपंचायतीचा दोन वर्षाचा ३० हजार रुपये घरकर सुद्धा बाकी आहे.आधीच नापिकीमुळे कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी धानाचे पैसे राईसमिल मालकाकडून मिळत नसल्याने पुन्हा कर्जाच्या डोहात बुडाला आहे. धानाचे पैसे मिळाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर आता आत्महत्येची पाळी आली आहे. धान विकून संसार चालविण्याच्या योजना आखणाऱ्या या शेतकऱ्यांवर कर्ज खंडणेही दुरापास्त झाले आहे. या प्रकरणाची तक्रार वरठी पोलीस स्टेशनसह मुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार मोहाडी इत्यादींना करण्यात आली आहे. मात्र पोलीस तपास संथगतीने सुरु असल्याने मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांनी पत्रपरिषद घेवून तपासाची गती वाढवून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याची मागणी केली आहे. पत्रपरिषदेला मोहगाव देवीचे सरपंच राजेश लेंढे, शशीमोहन काळे, मधुकर साठवणे, विकास बाळबुद्धे, विकास साठवणे, चंद्रशेखर साठवणे, क्रिष्णा निमजे, यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, सुनिल मेश्राम इत्यादी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना धानाचे पैसे देण्यास टाळाटाळ
By admin | Updated: September 26, 2016 00:54 IST