भंडारा : मोठ्या संकटावर मात करून त्यातून सुखरूप बाहेरही पडता येते. मात्र, त्याला हवी असते केवळ नशिबाची साथ. दैव बलवत्तर असल्याने अपघातानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या एका २२ वर्षीय युवकाची स्मृती परत आली. या अपघाताने दोन वर्षानंतर युवकाला कुटुंब मिळाल्याची घटना भंडारा येथे घडली.ओडिशातील सुभ्रतकुमार प्रेमसागर कर्मी या २२ वर्षीय युवकाची ही कहाणी. ओडिशातील बरगड जिल्ह्यातील भेडण येथील सुभ्रतकुमार याने दहावीची परीक्षा दिली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला विचारणा केली. यामुळे सुभ्रतकुमारने कुणालाही न सांगता घर सोडले. दरम्यान त्याच्याजवळ भ्रमणध्वनी असल्याने त्याने दोनदा घरच्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल हरविल्याने त्याचा घरच्यांशी संपर्क तुटला. दरम्यान, मनावर परिणाम पडल्याने त्याची स्मृतिभ्रंश झाला. अशा परिस्थितीत तो भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी भटकू लागला. मिळेल ते खाणे किंवा न मिळाल्यास उपाशीपोटी राहणे, अशी त्याची दैनंदिनी होती. कधी तो कपडे घालून तर कधी कपड्याविना भटकत राहायचा. असाच भटकत तो करडी परिसरात पोहोचला. येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या पुढे येऊन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करायचा. याबाबत अनेकांनी त्याला नग्नावस्थेत परिसरात बघितले. दरम्यान, सोमवारला करडी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर यांना करडी ते मोहगावजवळ अपघातात एक युवक जखमी अवस्थेत पडून असल्याचा भ्रमणध्वनीवर निरोप आला. त्यांनी कर्तव्यतत्परता दाखवीत घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांना स्मृतिभं्रश झालेला युवक दिसला. त्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती. मेहर यांनी त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने करडी येथून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तब्बल चार ते पाच तासानंतर तो शुध्दीवर आल्यानंतर त्याची स्मृती परत आली. पोलिसांनी त्याला नाव व गाव विचारले. अपघातापूर्वी स्मृतिभ्रंश झाल्याने काहीही सांगू न शकणाऱ्या युवकाला डोक्याला जबर मार लागल्याने त्याची स्मृती परतल्याने सर्वकाही आठवले. त्याला कुटुंबाची आठवण झाली. त्याने पोलिसांना त्याचा पूर्ण पत्ता सांगून घरच्यांचा भ्रमणध्वनी नंबर दिला. त्या नंबरवर पोलिसांनी संपर्क साधला असता सुभ्रतकुमारची माहिती सत्य असल्याची खातरजमा झाली. जिल्हा सामान्य रूग्णालयात जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय तातडीने भंडारा येथे दाखल झाले. सुभ्रतने त्याचा भाऊ अशोकला ओळखले. त्याला घ्यायला आलेल्या कुटुंबीयांनी सामान्य रूग्णालयातून त्याची सुट्टी केली असून आज त्याला ओडिशातील गावाला नेले. या अपघाताने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला. (शहर प्रतिनिधी)
अन् अपघाताने 'त्याची' स्मृती परतली
By admin | Updated: March 29, 2015 00:57 IST