इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी शासन जीवाचा आटापिटा करीत आहे. परंतु सत्य काही वेगळेच आहे. भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांची मोठ्या प्रमाणात गच्छंती झाली आहे. एकेकाळी ४७ शाळांचे संचालन नगर परिषद प्रशासन करीत होती. आजघडीला त्याची संख्या फक्त २० वर येऊन ठेपली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटसंख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रशासन मोठी कसरत करीत आहे. परंतु त्या विपरीत नगर परिषद किंवा नगरपंचायत हद्दीत असलेल्या उत्थानाबाबत शाळांच्या कारवाई होताना दिसून येत नाही. नगर परिषद शाळा वाचविण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली होत असल्या तरी स्थिती काही वेगळीच आहे. एकट्या भंडारा नगरपालिका क्षेत्रात १३ शाळ होत्या. त्यापैकी आजघडीला फक्त दोनच शाळा शिल्लक आहेत. भंडार शहरातील शहीद भगतसिंग उच्च प्राथमिक शाळा टाकळी भंडारा व मौलाना उर्दू प्राथमिक शाळेचा समावेश आहे.
उरल्या फक्त २० शाळाभंडारा जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत संचालित होणाऱ्या एकूण २० शाळा आहेत. यात प्राथमिक शाळा ११, उच्च प्राथमिक शाळा ३, उच्च प्राथमिक व हायस्कूल ५ आणि प्राथमिक- उच्च प्राथमिक व सेकंडरी शाळा एक आहे. भंडारा, तुमसर व पवनी नगरपालिका क्षेत्रातील शाळा गत २० वर्षात झपाट्याने रोडावल्या.
नेमके कारण तरी काय?नगर परिषदेच्या क्षेत्रांमध्ये पालिका प्रशासनाने अन्य शाळांना एनओसी देण्याचे काम मोठ्या झपाट्याने केले. त्यामुळे नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत गेली. दुसरीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीचा वाढता प्रभाव या नगर परिषदेच्या शाळांना बसला. सहाः स्थितीत गरिबांची मुलेच नगर परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. बजाज प्राथमिक शाळा, बुटी शाळा, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यासह अन्य शाळा बंद झाल्या. त्यातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडलेत.