लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी वीजपंपाचे थकित वीजबिलाचा भरणा करण्यासाठी शासनाच्या वीज कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष करीत नियमित वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तालुक्यातील २५१ कृषी वीजपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.लाखांदूर येथील वीज वितरण कंपनी अंतर्गत बारव्हा, लाखांदूर, सरांडी बु. व विरली बु. आदी चार मंडळांतर्गत तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. तथापि, बारव्हा मंडळात १ हजार ४३, लाखांदूर मंडळात १ हजार १९३, सरांडी बु. मंडळात १ हजार १३४ व विरली बु मंडळात ३ हजार ६३४ कृषी वीजपंंपधारक शेतकरी आहेत. या कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांकडे गत काही वर्षांपासून २४.१८ कोटी रुपयांचा वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०२० पासून एकूण ७.३४ कोटी रुपयांचे नियमित वीजबिल थकीत आहे.गत काही वर्षापासून कृषी वीजपंप अंतर्गत थकीत व नियमित बिलाचा भरणा करण्यासाठी शासनाने कृषी धोरण २०२०अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा पहिला टप्पा येत्या ३१ मार्चपर्यंत असल्याने तालुक्यातील कृषी वीजपंपधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत विविध योजनांचा लाभ उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सात कोटींचे वीज बिल थकीत
- लाखांदूर तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीजपंपधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांवर गत काही वर्षांपूर्वीपासून व नियमित वीजबिलाअंतर्गत कोटी रुपयाचे वीजबिल थकीत आहे. दरम्यान, तालुक्यातील एकूण २ हजार ४९ शेतकऱ्यांनी कृषी धोरण २०२० अंतर्गत लाभ उचलत जवळपास १.६१ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. दरम्यान, कृषी धोरण २०२०चा लाभ न उचलत गत काही वर्षांपासून थकित व नियमित वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीने तालुक्यातील एकूण २५१ कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांकडे एकूण ४७.४० लाख रुपयांचे नियमित वीजबिल थकीत असल्याने या कृषी वीजपंपधारक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.