देवानंद नंदेश्वर भंडारा२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला. नुकसान भरपाईपाकरीता ११,७७७ शेतकऱ्यासाठी १ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांची गरज आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच पाठविला आहे.भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अतिवृष्टी झाल्याने गहू, हरभरा, जवस व लाखोळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी आटोपत असतानाच शेतातील पिके कापणीयोग्य झाली होती. जिल्ह्यात गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. गव्हाची ओंबी आल्याने ती कापणीयोग्य झाली असतानाच अवकाळी पावसाचे आगमन झाले. गहू, हरभरा, जवस व लाखोळीचे रब्बी हंगामात मोठ्या हंगामात उत्पादन घेतल्या जाते. यासोबतच काही ठिकाणी बागायती शेती करण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठ्या पिकांना फटका बसला आहे. १ मार्चच्या मध्यरात्री भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे येथील शेतीत कापणीयोग्य असलेल्या गहू पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक नजरअंदाज अहवाल मागितला. या अहवालात ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद होते. यात ५० टक्केच्या आत ६ हजार १७९ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून ५० टक्केच्या वरील १ हजार ३६० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. अवकाळी पावसात बहरलेला आंब्याचा मोहोर गळून पडला होता. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला नुकताच अंतिम अहवाल पाठविला आहे. यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यातील १,६०१.४८ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांना ५० टक्केपेक्षा जास्त नुकसानीचा ११ हजार ७७७ शेतकऱ्यांना फटका बसला. यात जिल्ह्यातील केवळ भंडारा व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे.भंडारा तालुक्यातील ५९९.२० हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहाडी तालुक्यातील ९८२.३३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १८.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील १,५८१.५३ हेक्टर क्षेत्रातील विविध जिरायती पिकांचे तर १९.९५ हेक्टर क्षेत्रातील आंबा फळपिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा आहे.
११,७७७ शेतकऱ्यांसाठी १.३४ कोटींची गरज
By admin | Updated: April 1, 2015 00:34 IST