लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील पांढरवाडी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अज्ञात चोरट्यांनी तांबड्या रंगाचे तीन बैल बांधून ठेवून पोबारा केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मालक-बैलांची ओळख परेड झाल्यानंतर बैल संबंधित शेतकऱ्याला परत देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पांढरवाडी येथील शेतकरी सुरेश जाधव हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले. यावेळी त्यांंना शेतातील लिंबाच्या झाडाखाली तीन तांबड्या रंगाचे बैल बांधलेले आढळून आले. याबाबत जाधव यांनी आजूबाजूस विचारणा केली; परंतु बैल कुणाचे नसल्याचे सांगण्यात आले. हे बैल चोरीचे असल्याचा संशय आल्यानंतर पांढरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टकले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे बैल ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. ग्रामपंचायतीने पोलिसांना कळवून माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने चौकशी केली; परंतु हे बैल कोणाचेच नसल्याचे निदर्शनास आले.
...
ओळख पटवून बैल घेऊन जा...
पोलीस व ग्रामपंचायतीने ज्या कोणाचे बैल असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हे बैल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून आणले असावेत; परंतु सध्या जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे त्यांची विक्री झाली नसावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. दरम्यान, पोलीस बैल चोरट्यांचा शोध घेत आहेत.