धारूर ( बीड ) : राष्ट्रीय महामार्गावरील धारूर ते तेलगावा दरम्यान असलेल्या घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. घाटात रस्त्याचे काम अरूंद असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आज सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान साखर घेऊन जाणार एक ट्रक ( एम एच ४८ बी २६४८ ) दरीत कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धारूर घाटात अपघाताची मालिकाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीचा सिमेंट घेऊन जाणारा टँकर खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. आता घाटात साखर घेऊन जाणार ट्रक अवघड वळणावर सुरक्षा कठडा तोडून उलटला. लिंबाच्या झाडाला अडकल्याने २०० ते तीनशे फूट खोल दरीत पडण्यापासून वाचला. सुदैवाने ट्रकमधील चालक व वाहक बचावले आहेत.
या घाटात वारंवार अपघात होत असताना ही प्रशासन व लोकप्रतिनिधीचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. घाटातील अरुंद रस्ता आणखी किती बळी घेणार आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ठोस उपाययोजने अभावी अपघात वाढल्याने वाहन धारकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.