लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूर घाट : केज तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांनी शनिवारी सकाळी नांदूर घाट येथील एका कृषी सेवा केंद्रात जाऊन विविध प्रकारच्या सर्व लॉटमधील बियाण्यांच्या पिशवीतील बियाणांची प्रत्यक्ष कृती करून उगवण क्षमता तपासली. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी हे नियोजन केले आहे.
गतवर्षी खरीप हंगामात नांदूर घाट हे गाव राज्यात बोगस बियाणांमुळे चर्चेत आले होते. पेरणी केलेले सोयाबीनचे ग्रीन गोल्ड कंपनी व महाबीज कंपनी यांचे बियाणे उगवले नसल्याने एका शेतकऱ्याने दुकानासमोर डिझेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कंपनी व दुकानदार यांनी भरपाई देण्याचे मान्य केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
बोगस बियाणांचा मोठा फटका फक्राबाद या गावाला बसला. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सरपंच बिक्कड यांनी न्याय मिळवून दिला होता. परंतु दुबार पेरणीमुळे उत्पन्न घटले. हीच पुनरावृत्ती यावेळी होऊ नये म्हणून फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांनी शनिवारी नांदूर घाट येथे येऊन एका कृषी सेवा केंद्रातील पूर्ण लॉटमधील बियाणांची उगवण क्षमता प्रत्यक्ष कृती करून तपासली. यात सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या बियाणांचा समावेश आहे.
...
अशी तपासली उगवण क्षमता...
कृषी केंद्रातील प्रत्येक लॉटमधील सर्व बियाणे पिशवीतील पन्नास बिया घेऊन त्याचे रोपण केले होते. प्रथम प्रात्यक्षिकात ८५ टक्के बियाणांची उगवण क्षमता दिसून आली. तरीही आणखी पाच दिवसांनी आलेली रोपे पाहून शंभर टक्के खात्री केली जाईल, मगच शेतकरी बियाणांची खरेदी करणार आहेत, असे सरपंच नितीन बिक्कड यांनी सांगितले.
.....
गेल्यावर्षी गावातील ८० टक्के शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. दुबार पेरणीमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी मी गावातील पूर्ण शेतकऱ्यांना सर्व बियाणे उगवण क्षमता तपासूनच घ्यायला लावणार आहे. कोणी दुकानदार अडवणूक करीत असेल व जास्त दर घेत असेल तर शेतकऱ्यांनी फोन करावा. त्यांचे समाधान तत्काळ केले जाईल. त्या दुकानदाराला जाब विचारून कारवाईस भाग पाडले जाईल.
-नितीन बिक्कड, सरपंच, फक्राबाद.