बीड : शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणा-या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी आज अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले.बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. भगवा हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण शहर आज दणाणून गेले होते. रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली. उपस्थित हजारो मतदारांसमोर बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देऊन जाते. त्यांचा कडवा विरोध मी बघितला आहे आणि त्यांचे उबदार प्रेमही मी अनुभवले आहे. शिवसैनिक उघड वार करत असतो. छुपा वार तो करत नाही. मला माझ्या मोठ्या मताधिक्याने विजयाची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची पाच वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली. जयदत्त क्षीरसागरांनी शरद पवार, अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टीका केली. ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांच्या घराची काय अवस्था झाली, हे उभ्या महाराष्ट्राने त्यांची नाटके टिव्हीवर बघितली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणा-यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराला ते उगवतं, हेच नियतीने दाखवून दिलं आहे. माझं आणि जनतेचं नातं हे विकासाचं नातं आहे. ते अधिक दृढ आणि बळकट होत आहे. देशात आणि राज्यात विकासाची लहर सुरू झाली आहे. लोकांना विकास हवाय. जातीपातीचं राजकारण नकोय, गेल्या पाच वर्षात युतीच्या सरकारने विकासाचा महामेरू उभा केला आहे. पुन्हा युतीचेच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. भगवा ध्वज विधीमंडळावर फडकणार आहे. भावी काळ आपला असेल. दुष्काळाची झळा सोसलेल्या मराठवाड्याच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. मी आज मत मागतोय ते व्हिजन करता. पुढच्या पिढीकरीता, आमची सत्ता ही तुमच्या भविष्यासाठी असणार आहे. असा शब्द मी देतो, असे जयदत्त क्षीरसागरांनी ठासून सांगितले.यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, संपदा गडकरी, संगीता चव्हाण, चंद्रकला बांगर, जयंिसगमामा चुंगडे, हनुमान पिंगळे, सर्जेराव तांदळे, डॉ योगेश क्षीरसागर, जगदीश काळे, अरुण डाके, अरुण बोंंगाणे, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, नितीन धांडे, बंडू पिंगळे, सागर बहीर, संजय महाद्वार, सुनील सुरवसे, किशोर काळे, विकास जोगदंड, माणिक वाघमारे, बाप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, शेषराव फावडे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ योगेश क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले.तुम्ही आमदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात : अर्जुन खोतकरबीडकरांनो, तुम्ही या निवडणुकीत एक आमदार नाही तर जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाची दृष्टी असणारा प्रबळ नेता निवडून देत आहात, म्हणजेच मंत्री निवडून देत आहात. त्यांचा विजय किर्तीमान विजय असणार आहे हे मी खात्रीने सांगतो. स्व.केशरकाकू क्षीरसागरांचा वारसा त्यांनी मोठ्या हिंमतीने चालवला. एक अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी ही आपली आहे.त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या जाळ्यातून येथील लोकांना रोजगार मिळवून दिला. हा ढाण्या वाघ आज उमेदवारी अर्ज दाखल करून आला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा, हाच संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करून बीडचा गड आपल्या राखायचा आहे, असे आवाहन शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
बीडमध्ये रॅलीने भगवी लाट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:07 IST
निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले.
बीडमध्ये रॅलीने भगवी लाट...!
ठळक मुद्देबीडची जनता माझ्यासाठी सदैव दैवतच : निर्धार सभेमध्ये भाऊक झालेले जयदत्त क्षीरसागर जनसागरासमोर नतमस्तक