गारा, पाऊस आणि वादळामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
आज दिवसभर वातावरणातील उकाडा वाढलेला होता. त्यातच ढगाळ हवामान दुपारपासून निर्माण झाले होते. सायंकाळी पाचपासून शिरूरमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. वेळंब परिसरात पाच मिनिटे गारपीटही झाली. या पावसाने शहरातील रस्त्यावर विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. शेतात असलेल्या लोकांना पावसापासून निवाऱ्यासाठी झाडांचा आश्रय घ्यावा लागला. दुचाकीस्वारांची त्रेधा उडाली. पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असल्याचे गोमाळवाडा येथील शेतकरी पांडुरंग गवळी यांनी सांगितले.
उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून काही अंशी सुटका झाली आहे. मागील वेळेच्या गारपिटीचा अनुभव वाईट असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली.