अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने भाजी दरांमध्ये घसरण झाली आहे. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, पालेभाज्या, भाज्यांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकीचोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडीचोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बाजारतळ व्यवस्था करा
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजीविक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरुस्ती करून सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कारवाईची मागणी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
स्वच्छतेविना दुर्गंधी
बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. धान्य गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात आहे.