आंबेवडगाव ते उपळी हा जुना निजामकालीन शिवरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. शासन दरबारी शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन अर्ज सादर करून काहीच उपयोग झाला नाही. तहसीलदार रस्ता मोकळा करून देत नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. हा दोन किलो मीटरचा शेत रस्ता शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा असून तो उपळी येथून थेट बीड रस्त्याला जोडला जातो. या मुळे शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मशागतीची अवजारे, बैलगाडी नेताना खूप कसरत करावी लागते. साधी मोटरसायकल पण या रस्त्याने जाता येत नाही. पावसाळ्यात तर ऐन पेरणीच्या हंगामात रस्त्याने चालताही येत नाही. या पांदण रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला जात असल्याने याप्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी मोकिंद घोळवे यांनी दिला.
आंबेवडगाव उपळी जुन्या शिवार रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST